पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन "मन की बात"द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद (29 एप्रिल 2018)

Posted On: 29 APR 2018 12:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 एप्रिल 2018

 

माझ्या प्रिय देशबांधवांनो ! नमस्कार

अलीकडेच 4 एप्रिल ते 15 एप्रिल पर्यंत ऑस्ट्रेलिया मध्ये 21व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन झाले होते. भारतासह जगभरातील 71 देश यात सहभागी झाले होते. जेव्हा इतक्या भव्य स्तरावर आयोजन केले जाते, जगभरातील हजारो खेळाडू यात सहभागी होतात, तुम्ही कल्पना करू शकता तिथले वातावरण कसे असेल? जोश, उत्कंठा, उत्साह, आशा, आकांक्षा, काहीतरी करून दाखवण्याचा संकल्प – जेव्हा असे वातावरण असते तेव्हा कोण यापासून अलिप्त राहू शकेल. हा असा काळ होता जेव्हा देशभरातील लोकं विचार करायची की, आज कोण कोणते खेळाडू खेळणार आहेत. भारताची कामगिरी कशी असेल, आपण किती पदकं जिंकू आणि हे सगळे खूप स्वाभाविक देखील होते. आपल्या खेळाडूंनी देखील देशवासीयांच्या अपेक्षा पूर्ण करत चांगली कामगिरी केली आणि एका पाठोपाठ एक पदक जिंकले. मग ते नेमबाजी असो, कुस्ती असो, भारोत्तलन असो, टेबल टेनिस असो किंवा बॅडमिंटन भारताने सर्वोत्तम  कामगिरी केली आहे. 26 सुवर्ण, 20 रजत, 20 कांस्य – भारताने एकूण 66 पदकांची कमाई केली आहे. या यशामुळे प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो. पदक जिंकण ही प्रत्येक खेळाडूसाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब असते. सर्व देशासाठी, सर्व देशवासीयांसाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण असतो. सामना संपल्यानंतर जेव्हा भारताचे प्रतिनिधित्व करत भारताचे खेळाडू पदकासोबत उभे असतात. तिरंगा त्यांच्या भोवती असतो, राष्ट्रगीत सुरु असते आणि तेव्हा जी समाधान आणि आनंदाची, गौरवाची, मान सन्मानाची भावना प्रत्येकामध्ये  असते ती अत्यंत विशेष असते. तन-मन हेलावून सोडणारी असते. उत्साह आणि जोशपूर्ण असते. त्या भावना व्यक्त करायला कदाचित माझ्याकडील शब्द कमी पडतील. परंतु ह्या खेळाडूंकडून जे मी ऐकले आहे ते मी तुम्हाला ऐकवू इच्छितो. मला तर अभिमान वाटतो, तुम्हाल देखील अभिमान वाटेल.

#

मी मनिका बत्रा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 4 पदकांची कमाई केली आहे. 2 सुवर्ण, 1 रजत, 1 कांस्य. ‘मन की बात’ कार्यक्रम ऐकणाऱ्या श्रोत्यांना मी सांगू इच्छिते की, मी खूप आनंदी आहे कारण भारतात पहिल्यांदाच टेबल टेनिस, इतका लोकप्रिय होत आहे. होय, मी माझे सर्वोत्तम टेबल टेनिस खेळली असेल. माझ्या संपूर्ण आयुष्यातील उत्तम टेबल टेनिस खेळली असेल. मी या आधि जो सराव केला आहे त्याच्याविषयी मी सांगते, माझे प्रशिक्षक संदीप सर यांच्यासोबत मी खूप सराव केला आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या आधि आमचे कॅंम्प पोर्तुगालला होते, क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी सरकारने आम्हाला तिथे पाठवले होते. मी सरकारचे आभार मानू इच्छिते कारण त्यांनी अनेक वेळा आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी दाखवायची संधी आम्हाला उपलब्ध करून दिली. तरुण पिढीला मी इतकाच संदेश देईन कधी हार मानू नका. स्वतःचा शोध घ्या.

#

मी पी. गुरुराज ‘मन की बात’ कार्यक्रम ऐकणाऱ्यांना ही गोष्ट सांगू इच्छितो. 2018 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक जिंकणे हे माझे स्वप्न होते. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला मी पहिले पदक मिळवून दिल्यामुळे मी खूप आनंदी आहे. हे पदक मी माझे  गाव कुंदापुरा आणि माझे राज्य कर्नाटक आणि माझ्या देशाला समर्पित करतो.

#

मीराबाई चानू

21 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मी भारताला पहिले सुवर्ण पदक जिंकून दिले. त्यामुळे यातच मला खूप आनंद झाला होता. माझे एक स्वप्न होते भारतासाठी आणि मणिपूरसाठी एक उत्तम खेळाडू बनायचे, जसे सगळ्या चित्रपटांमध्ये दाखवतात. जशी मणिपूरची माझी दीदी आणि ते सर्व पाहिल्यानंतर मी देखील असा विचार केला की, भारतासाठी, मणिपूरसाठी एक उत्तम खेळाडू बनू इच्छिते. माझी शिस्त, माझा प्रामाणिकपणा, समर्पण आणि कठोर परिश्रम हे देखील माझ्या यशाचे कारण आहे.

 

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने उत्कृष्ट कामगिरी केली होती, तसेच ती विशेष देखील होती. विशेष यासाठी कारण यावेळी अशा अनेक गोष्टी होत्या ज्या पहिल्यांदाच घडल्या. तुम्हाला माहित आहे का? यावेळी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतातर्फे जितके कुस्तीपटू खेळले त्या सर्वांनी पदकांची कमाई केली आहे. मनिका बत्राने जितक्या स्पर्धांमध्ये भाग घेतला त्या सर्वांमध्ये पदक जिंकली. ती पहिली भारतीय महिला खेळाडू आहे जिने, वैयक्तिक टेबल टेनिस स्पर्धेत भारताला पहिले सुवर्ण पदक जिंकून दिले. भारताला सर्वाधिक पदक नेमबाजीत मिळाली. 15 वर्षीय भारतीय नेमबाज अनीश भंवर हा राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारा सर्वांत तरुण खेळाडू ठरला. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक जिंकणारा सचिन चौधरी हा एकमेव भारतीय पॅरा पॉवर लिफ्टर आहे. यावेळेची क्रीडा स्पर्धा विशेष देखील होती कारण, बहुतांश पदक विजेत्या ह्या महिला खेळाडू होत्या. स्क्वॅश असो, बॉक्सिंग असो,  वेटलिफ्टिंग असो,  नेमबाजी असो - महिला खेळाडूंनी उत्तम कामगिरीचे प्रदर्शन केले. बॅडमिंटनमध्ये तर अंतिम सामना दोन्ही भारतीय खेळाडू, सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधूच्या दरम्यान खेळला गेला. सगळे या लढतीबद्दल उत्सुक होते, दोन्ही पदकं भारतालाच मिळणार होती – सर्वांनी हा सामना पाहिला. मला देखील हा सामना खूप आवडला. स्पर्धांमध्ये भाग घेणारे खेळाडू देशाच्या विविध भागांमधून, छोट्या छोट्या शहरांमधून आले होते. अनेक संकट, समस्यांवर मात करत ते इथवर पोहोचले आहेत आणि आज त्यांनी जे स्थान मिळवले आहे, ते ज्या लक्ष्यापर्यंत पोहोचले आहेत, त्यांच्या ह्या जीवन यात्रेत त्यांचे आई वडील असो, त्यांचे पालक असो, प्रशिक्षक असो, सपोर्ट स्टाफ असो, शाळेतील शिक्षक असो, शालेय वातावरण असो – सर्वांचे योगदान आहे. त्यांच्या मित्रांचेही योगदान आहे, ज्यांनी प्रत्येक परिस्थितीत त्यांचे मनोधैर्य उंचावले. मी त्या सर्व खेळाडूंसह त्या सर्वांचे अभिनंदन करतो.

मागील महिन्यात ‘मन की बात’ मध्ये मी देशवासियांना विशेषतः आपल्या युवकांना फिट इंडियाचे आवाहन केले होते आणि मी प्रत्येकाला आमंत्रण दिले होते. या ! फिट इंडिया मध्ये सहभागी व्हा, ‘फिट इंडिया’चे प्रतिनिधित्व करा. आणि मला खूप आनंद होत आहे की, मोठ्या उत्साहाने लोकं यात सहभागी होत आहेत. बऱ्याच लोकांनी पत्र लिहून आपला पाठिंबा दर्शविला आहे, पत्र पाठविली आहेत, सोशल मिडीयावर आपला आरोग्याचा मंत्र – फिट इंडिया गाथा शेअर केल्या आहेत.

 एक गृहस्थ शशिकांत भोसले यांनी जलतरण तलावातील आपले छायचित्र शेअर करत लिहिले आहे

My weapon is my body, my element is water, My world is swimming.

 

रुमा देवनाथ यांनी लिहिले आहे - मॉर्निंग वॉकमुळे मला आनंदी आणि निरोगी वाटते. आणि त्या अजून पुढे सांगतात - For me – fitness comes with a smiles and we should smile, when we are happy. देवनाथजी यात काहीच शंका नाही की, आनंदातच आरोग्य आहे.

 धवल प्रजापती यांनी गिर्यारोहणाचे आपले छायाचित्र शेअर करताना लिहिले की – ‘माझ्यासाठी प्रवास आणि गिर्यारोहण हेच फिट इंडिया आहे’. अनेक प्रसिद्ध व्यक्ती अत्यंत आकर्षक पद्धतीने आपल्या तरुणांना फिट इंडियासाठी प्रोत्साहित करत आहेत हे पाहून मला खूप चांगले वाटते. चित्रपट अभिनेता अक्षय कुमार याने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. मी तो पहिला आहे तुम्ही देखील बघा; यात तो लाकडी मण्यांसोबत व्यायाम करताना दिसतो आणि त्याने सांगितले आहे की, हा व्यायाम पाठ आणि पोटाच्या स्नायूंसाठी खूप लाभदायक आहे. त्याचा अजून एक व्हिडिओ देखील लोकप्रिय झाला आहे ज्यात तो लोकांसोबत वॉलीबॉल खेळत आहे. अजून बऱ्याच युवकांनी फिट इंडियामध्ये सहभागी होत आपले अनुभव शेअर केले आहेत. मला असे वाटते की, अशा चळवळी आपल्या सर्वांसाठी, संपूर्ण देशासाठी अत्यंत फायद्याच्या आहेत. अजून एक गोष्ट मी नक्की सांगेन – कोणतेही पैसे खर्च न करता फिट इंडिया चळवळीचे नाव आहे ‘योग’. फिट इंडिया अभियानात योग चे विशेष महत्व आहे आणि तुम्ही सगळ्यांनी देखील तयारी सुरु केली असेल. 21 जून ‘आंतरराष्ट्रीय योग दिनाचे’ महत्व तर आता संपूर्ण जगाने स्विकारले आहे. तुम्ही देखील आतापासूनच तयारीला लागा. एकट्याने नाही – तुमचे शहर, तुमचे गाव, तुमचा विभाग, तुमची शाळा, तुमचे महाविद्यालय प्रत्येक व्यक्ती कोणत्याही वयाची – पुरुष असो, स्त्री असो योग मध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संपूर्ण शारीरिक विकासासाठी, मानसिक विकासासाठी, मानसिक संतुलनासाठी योगचा काय उपयोग आहे, आता भारतात आणि जगभरात सांगण्याची आवश्यकता नाही आणि आपण पाहिले असेल की मला एक अॅनिमेटेड व्हिडिओ दाखविला गेला आहे, जो सध्या खूप लोकप्रिय होत आहे. एक शिक्षक जितक्या बारकाईने जे काम करू शकतो ते अॅनिमेशनने साध्य होत आहे, अॅनिमेशनच्या लोकांचे मी यासाठी देखील अभिनंदन करतो. तुम्हाला देखील त्याचा लाभ मिळेल.

माझ्या तरुण मित्रांनो ! आता तर तुम्ही परीक्षा, परीक्षा, परीक्षेतून बाहेर पडून सुट्यांची काळजी करत असाल. सुट्टी कशी घालवायची, कुठे जायचे याचा विचार करत असाल. तुम्हाला एका नविन कामासाठी आमंत्रित करण्यासाठी आज मी तुमच्याशी बोलू इच्छितो आणि मी पाहिले आहे की, अनेक तरुण यावेळी नवीन काहीतरी शिकत असतात. समर इंटर्नशिपचे महत्व वाढत आहे आणि तरुण वर्ग देखील ते शोधत आहेत, आणि असेही इंटर्नशिपमध्ये एक नवीन अनुभव मिळतो. माझ्या तरुण मित्रांनो, एका विशेष इंटर्नशिपमध्ये सहभागी होण्याची मी तुम्हाला विनंती करतो. भारत सरकारची तीन मंत्रालये क्रीडा असो, मनुष्यबळ विकास असो, पेयजल विभाग असो – सरकारच्या तीन-चार मंत्रालयांनी एकत्र येवून 'स्वच्छ भारत ग्रीष्मकालीन इंटर्नशिप 2018’ उपक्रम सुरु केला आहे. महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी, एनसीसीचे तरुण, एनएसएसचे तरुण, नेहरू युवा केंद्रातील तरुण, जे काही करू इच्छितात, समाजात बदल घडवून आणण्यासाठी जे सहभागी होऊ इच्छितात, निमित्त बनू इच्छितात; एक सकारात्मक उर्जा घेऊन समाजामध्ये काहीतरी करण्याचा निश्चय करतात, त्या सर्वांसाठी एक संधी आहे आणि यामुळे स्वच्छतेला देखील बळकटी मिळेल आणि जेव्हा आपण 2 ऑक्टोंबर पासून महात्मा गांधींची 150वी जयंती साजरी करू, त्याआधी आपण काहीतरी केले याचा आपला आनंद मिळेल आणि मी हे देखील सांगतो की जे सर्वोत्तम प्रशिक्षुक असतील, ज्यांनी महाविद्यालयात उत्तम काम केले असेल, विद्यापीठांमध्ये केले असेल – अशा सर्वांना राष्ट्रीय पुरस्कार दिले जातील. ही इंटर्नशिप यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या प्रत्येक प्रशिक्षुकाला ‘स्वच्छ भारत मिशन’ द्वारे एक प्रशस्तीपत्र दिले जाईल. एवढेच नाही तर जे प्रशिक्षुक हे पूर्ण करतील त्यांना युजीसी दोन क्रेडीट पॉईंट देखील देणार आहे. मी विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना आणि तरुणांना पुन्हा एकदा या इंटर्नशिपचा लाभ घेण्यासाठी आमंत्रित करतो. तुम्ही मायगोव्ह वर  'स्वच्छ भारत समर इंटर्नशिप' साठी नोंदणी करू शकता. मला आशा आहे की, आपले तरुण स्वच्छतेच्या या आंदोलनाला नक्की यशस्वी करतील. मी आपल्या प्रयत्नांबद्दल जाणून घेण्यास उत्सुक आहे आपण आपली माहिती पाठवा, कथा पाठवा , फोटो पाठवा, व्हिडिओ पाठवा. चला ! एक नवीन अनुभव घेण्यासाठी या सुट्ट्यांचा एक संधी म्हणून उपयोग करूया.

माझ्या प्रिय देशबांधवांनो ! जेव्हा संधी मिळते तेव्हा मी दूरदर्शनवरील 'गुड न्यूज इंडिया' हा कार्यक्रम नक्की पाहतो आणि मी देशवासियांनाही आवाहन करीन की तुम्हीपण 'गुड न्यूज इंडिया' पहावे. आपल्या देशातल्या कोणत्या कानाकोपऱ्यात किती लोकं अनेक प्रयत्न करून चांगले काम करत आहेत, चांगल्या गोष्टी घडत आहेत याची आपल्याला माहिती मिळते.

मी मागे पहिले की, गरीब मुलांच्या शिक्षणासाठी नि:स्वार्थ भावनेने काम करणाऱ्या तरुणांची गोष्ट यात दाखवत होते. तरुणांच्या या समूहाने रस्त्यावरील आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांच्या शिक्षणासाठी एक मोठे अभियान सुरु केले आहे. सुरवातीला रस्त्यावर भिक मागणाऱ्या किंवा छोटे मोठे काम करणाऱ्या मुलांच्या परिस्थितीने त्यांना इतके हेलावून सोडले की त्यांनी या कामात स्वतःला संपूर्णपणे झोकून दिले. दिल्लीतल्या गीता कॉलनी जवळील झोपडपट्टीतील 15 मुलांपासून सुरू झालेली ही मोहीम आता राजधानीतल्या 12 ठिकाणच्या 2 हजार मुलांपर्यंत पोहोचली आहे. या मोहिमेशी निगडीत तरुण, शिक्षक आपल्या व्यस्त  दिनचर्येतून दोन तासाचा वेळ काढून सामाजिक बदल घडवण्याच्या या भगीरथ प्रयत्नांत सहभागी झाले आहेत.

बंधू-भगिनींनो, त्याचप्रमाणे उत्तराखंडच्या डोंगराळ प्रदेशातील काही शेतकरी देशभरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्त्रोत ठरले आहेत. एकत्रित प्रयत्नांमधून त्यांनी केवळ स्वतःचेच नाहीतर आपल्या क्षेत्राचेही भाग्य बदलले आहे. उत्तराखंडमधील बागेश्वर इथे मुख्यत्वे मांडवा, चौलाईत मका किंवा जवाचे पिकं घेतले जाते. डोंगराळ प्रदेशामुळे, शेतक-यांना योग्य किंमत मिळत नव्हती, परंतु कापकोट तालुक्यातील शेतक-यांनी ही पिके थेट बाजारात विकून तोटा सहन करण्याऐवजी, त्यांनी  मूल्यवर्धित मार्ग अवलंबला. त्यांनी काय केलं – शेतातील या पिकापासून बिस्किटे बनवायला सुरुवात केली आणि ती बिस्किटे विकायला सुरुवात केली. हा भाग लोह समृद्ध आहे असा मजबूत विश्वास आहे. आणि लोहयुक्त बिस्किटे गर्भवती महिलांसाठी अतिशय उपयुक्त आहेत. या शेतक-यांनी मुन्नार गावात एक सहकारी संस्था स्थापन केली आहे आणि तिथे बिस्किटे तयार करण्यासाठी कारखाना उघडला आहे. शेतकऱ्यांच्या धैर्याची दखल घेत प्रशासनानेही याला राष्ट्रीय उपजीविका अभियानाशी जोडले आहे. ही बिस्किटे आता फक्त बागेश्वर जिल्ह्यातील जवळजवळ पन्नास आंगणवाडी केंद्रातच नव्हे तर अल्मोडा आणि कौसणी पर्यंत वितरित केली जात आहेत. शेतक-यांच्या कठोर परिश्रमामुळे संस्थेची वार्षिक उलाढाल केवळ 10 ते 15 लाख रुपयांपर्यंत पोहचली नाही, तर 900 पेक्षा जास्त कुटुंबांना रोजगाराची संधी मिळाल्यामुळे जिल्ह्यातून होणारे पलायन देखील कमी झाले आहे.

माझ्या प्रिय देशवासियांनो ! जेव्हा आपण ऐकतो की भविष्यात जगामध्ये पाण्यासाठी युद्ध होतील. प्रत्येकजण ही गोष्ट बोलतो परंतु आपली कोणतीच जबाबदारी नाही का? जलसंवर्धन ही सामाजिक जबाबदारी असावी असं आपल्याला वाटत नाही का? प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी असली पाहिजे. पावसाचा प्रत्येक थेंब आपण कसा वाचवू शकतो आणि आम्हाला माहित आहे की भारतीयांसाठी जल संवर्धन हा नवीन विषय नाही, तो पुस्तकांचा विषय नाही, हा भाषेचा विषय नाही. शतकानुशतके आपल्या पूर्वजांनी हे करून दाखवले आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाला त्यांनी प्राधान्य दिले आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब कशाप्रकारे वाचवता येईल यासाठी त्यांनी नवीन नवीन उपाय शोधले आहेत. तुमच्यापैकी ज्यांना तमिळनाडूला जाण्याची संधी मिळाली आहे त्यांनी कदाचित पहिले असेल की तमिळनाडूतील काही मंदिरात सिंचन पध्दती, जलसंवर्धन व्यवस्था, दुष्काळ व्यवस्थापन यासंदर्भात मंदिरांमध्ये मोठेमोठे शिलालेख लिहिलेले आहेत. मनारकोविल, चिरण महादेवी, कोविलपट्टी किंवा पुडुकोट्टई असो, तुम्हाला सर्वत्र मोठेमोठे शिलालेख दिसतील. आजही, विविध विहिरी पर्यटन स्थळ म्हणून लोकप्रिय आहेत परंतु आपल्याला हे विसरून चालणार नाही की आपल्या पूर्वजांच्या जल संवर्धन अभियानाचे हे जिवंत पुरावे देखील आहेत. गुजरातमध्ये अडलाज आणि पाटणच्या राणीची विहीर ही युनेस्को जागतिक वारसा आहेत, त्यांची भव्यता पाहण्याजोगी आहे. विहिरी ह्या एकप्रकारे जलमंदिरच तर असतात. तुम्ही राजस्थानला गेलात तर जोधपूरमध्ये चांद विहीर पाहायला नक्की जा. ही भारतातील सर्वात मोठी आणि सुप्रसिद्ध विहीर आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या भागात पाण्याची कमतरता आहे तिथे ही आहे. एप्रिल, मे, जून, जुलै कालावधी असतो ज्यावेळी पावसाचे पाणी साठवण्याची उत्तम संधी असते आणि जर आम्ही अगोदरच तयार केली तर आपल्याला तितका जास्त लाभ मिळेल. या जल संरक्षणाच्या कामात मनरेगाच्या निधीचा देखील उपयोग होतो. गेल्या तीन वर्षांत प्रत्येकाने जलसंधारण आणि जलव्यवस्थापनाच्या दिशेने स्वतःच्या पद्धतीने प्रयत्न केले आहेत. प्रत्येक वर्षी मनरेगाच्या निधी व्यतिरिक्त सरासरी 32 हजार कोटी रुपये जलसंधारण आणि जल व्यवस्थापनावर खर्च झाला आहे. 2017-18 विषयी बोलायचे झाले तर, 64 हजार कोटींच्या एकूण खर्चापैकी 55% खर्च म्हणजे अंदाजे 35 हजार कोटी रुपये जलसंधारण सारख्या कामासाठी खर्च करण्यात आले आहेत. गेल्या तीन वर्षांत जवळजवळ अशा जलसंधारण आणि जलव्यवस्थापन उपाययोजनांमुळे अंदाजे 150 लाख हेक्टर जमिनीला याचा फायदा झाला आहे. मनरेगाद्वारे जलसंवर्धन आणि जल व्यवस्थापन यासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो काही लोकांनी त्याचा फायदा घेतला आहे. केरळमधील कुट्टूमपेरूर नदीवर मनरेगाचे काम करणाऱ्या 7 हजार लोकांनी 70 दिवस काम केले आणि त्या नदीला पुनरुज्जीवीत केले. गंगा आणि यमुना नदीमध्ये पाणी आहे परंतु उत्तरप्रदेशात असे अजून अनेक प्रदेश आहेत; जसे फतेपूर जिल्ह्यातील ससुर खदेरी या दोन्ही नद्या कोरड्या झाल्या आहेत. मनरेगा अंतर्गत जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात जमिनीची आणि जलसंवर्धनची जबाबदारी उचलली आहे. सुमारे 40 ते 45 गावातील लोकांच्या मदतीने ससुर खदेरी या सुखालेल्या नद्यांना पुनरुजीवीत केले आहे.पशु असो, पक्षी असो,  शेतकरी असो, शेती असो, गाव असो,हे एक मोठे यश आहे. मी असे म्हणेन की पुन्हा एकदा एप्रिल, मे, जून, जुलै आपल्या समोर आहेत, आपण पाणी संचय, जलसंवर्धनसाठी आपण देखील काही जबाबदाऱ्या घेतल्या पाहिजेत, आपणही काही योजना तयार केल्या पाहिजेत, आपण देखील काहीतरीही करून दाखवू.

माझ्या प्रिय देशबांधवांनो ! जेव्हा ‘मन की बात’ असते, तेव्हा चोहूबाजूंनी मला संदेश येतात, पत्र येतात, फोन येतात. पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील देवितोला गावातील आयन कुमार बॅनर्जी यांनी मायगोव्हवर लिहिले आहे की, "आपण दरवर्षी रवींद्र जयंती साजरी करतो परंतु अनेकांना नोबेल विजेत्या  रवींद्रनाथ टागोरांचे शांततेने, सुंदर आणि सचोटीने जीवन जगण्याचे तत्त्वज्ञान माहित नाही. कृपया 'मन की बात’ कार्यक्रमामध्ये या विषयावर चर्चा करा म्हणजे लोकांना याविषयी माहिती मिळेल.

मी आयनजीचे आभार मानतो की त्यांनी ‘मन की बात’च्या सर्व सोबत्यांचे लक्ष याकडे आकर्षित केले. गुरुदेव टागोर हे ज्ञान आणि विवेकबुद्धीने परिपूर्ण व्यक्तिमत्व होते, ज्यांच्या लेखणीने सर्वांवर एक ठसा उमटविला आहे. रवींद्रनाथ हे एक प्रतिभावान, बहुआयामी व्यक्ती होते, परंतु त्यांच्यामध्ये प्रत्येक क्षणी एक शिक्षक असायचा. त्यांनी गीतांजली मध्ये लिहिले आहे-  ‘He, who has the knowledge has the responsibility to impart it to the students.’अर्थात ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याने ते जिज्ञासू लोकांना दिले पाहिजे ही त्याची जबाबदारी आहे.

 मला बंगाली भाषा तर येत नाही, पण जेव्हा मी लहान होतो तेव्हा मी फारच लवकर उठायचो - बालपणापासून आणि पूर्व भारतात रेडिओ लवकर  सुरु होतो, पश्चिम भारतात उशीरा सुरू होतो, मला अंधुकसे आठवत आहे ; कदाचित सकाळी 5.30 वाजता रेडिओवर रबींद्र संगीत सुरू व्हायचे आणि मला त्याची सवय झाली होती. भाषा तर येत नव्हती, सकाळी लवकर उठून रेडिओवर रवींद्र संगीत ऐकायची मला सवय झाली होती आणि जेव्हा आनंदलोके आणि आगुनेर, पोरोशमनी – या कविता ऐकायची संधी मिळायची तेव्हा मनाला एक नवचेतना मिळायची. तुम्हाला देखील रवींद्र संगीत, त्यांच्या कवितांनी नक्कीच प्रभवित केले असेल. मी रवींद्रनाथ ठाकूर यांना आदरांजली अर्पण करतो.

माझ्या प्रिय देशबांधवांनो ! काही दिवसातच रमजानचा पवित्र महिना सुरु होणार आहे. संपूर्ण जगभर रमजान महिना संपूर्ण श्रद्धेने आणि आदराने साजरा केला जातो. रोज्याचा सामुहिक उद्देश हा आहे की, जेव्हा एखादी व्यक्ती स्वत: उपाशी असते तेव्हा त्याला इतरांच्या भुकेची देखील जाणीव होते. जेव्हा त्याला स्वतःला तहान लागते, तेव्हा त्याला इतरांच्या तहानेची जाणीव होते.पैगंबर मोहम्मद यांची शिकवण आणि संदेश लक्षात ठेवण्याची ही एक संधी आहे. त्यांच्यासारखे समानता आणि बंधुभावाच्या मार्गावर चालणे ही आपली जबाबदारी आहे. एकदा एका व्यक्तीने पैगंबरांना विचारले - "इस्लाममध्ये कोणते काम उत्तम आहे?" पैगंबर साहेब म्हणाले, "गरीब आणि गरजूंना अन्न देणे आणि प्रत्येकाची आपुलकीने विचारपूस करणे,मग तुम्ही त्यांना ओळखत असाल किंवा नाही." प्रेषित मोहम्मद यांचा ज्ञान आणि करुणेवर विश्वास होता. त्यांना कोणत्याच गोष्टीचा अहंकार नव्हता. ते सांगायचे की अहंकाराच ज्ञानाला पराभूत करते. प्रेषित मोहम्मद यांचा असा विश्वास होता की जर तुमच्याकडे गरजेपेक्षा अधिक असेल तर ते गरजू व्यक्तीला द्या, म्हणूनच रमजानमध्ये दान करण्याला देखील खूप महत्व आहे. लोक या पवित्र महिन्यामध्ये गरजूंना दान देतात. प्रेषित मोहम्मद यांचा विश्वास होता की एखादी व्यक्ती ही संपत्तीमुळे नाही तर तिच्या पवित्र आत्म्यामुळे श्रीमंत असते. मी सर्व नागरिकांना रमजान महिन्याचा शुभेच्छा देतो आणि मला आशा आहे की ही संधी लोकांना शांततेचा आणि सद्भावनेचा संदेश पाळण्यास प्रवृत्त करेल.

माझ्या प्रिय देशबांधवांनो ! बुद्ध पोर्णिमा प्रत्येक भारतीय साठी एक विशेष दिवस आहे. आम्हाला अभिमान वाटला पाहिजे की भारत ही करुणा, सेवा आणि त्याग करण्याची शक्ती दर्शविणाऱ्या भगवान बुद्धांची भूमी आहे , ज्यांनी जगभरातील  लाखो लोकांना मार्गदर्शन केले. ही बुद्ध पोर्णिमा भगवान बुद्धांचे स्मरण करत, त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करून त्याचे अनुसरण करण्याच्या जबाबदारीची आठवण करून देते. भगवान बुद्ध समता, शांती, एकता आणि बंधुता यांची प्रेरणा शक्ती आहेत. ही अशी मानवी मुल्ये आहेत, ज्यांची आजच्या जगात सर्वाधिक आवशक्यता आहे. बाबासाहेब डॉ. आंबेडकर जोर देवून सांगायचे की, त्यांच्या सामाजिक तत्त्वज्ञानात भगवान बुद्धांचे खूप मोठे प्रेरणास्थान आहे. त्यांनी सांगितले होते - My Social philosophy may be said to be enshrined in three words; liberty, equality and fraternity. My Philosophy has roots in religion and not in political science. I have derived them from the teaching of my master, The Buddha.

बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून दलित असो, पीडीत असो, शोषित असो, वंचित असो करोडो लोकांना सक्षम केले. करुणेचे याहून मोठे उदाहरण असूच शकत नाही. लोकांचे दुःख समजून घेण्यासाठी भगवान बुद्धांच्या महान गुणांपैकी करुणा हा एक गुण होता. असे म्हटले जाते की बौद्ध भिक्षुकांनी वेगवेगळ्या देशांत प्रवास केला. ते त्यांच्यासोबत भगवान बुद्धांचे समृद्ध विचार घेऊन जात आणि असे नेहमीच होत असते. संपूर्ण आशियामध्ये भगवान बुद्धांच्या शिकवणुकीचा वारसा मिळाला आहे. अनेक आशियाई देश जसे चीन, जपान, कोरिया, थायलंड, कंबोडिया, म्यानमारसारख्या अनेक देशांमध्ये अनेक बौद्ध परंपरा आणि बौद्ध शिकवण खोलवर रुजली आहे आणि याच कारणास्तव आम्ही बौद्ध पर्यटनासाठी पायाभूत सुविधा विकसित करत आहोत, ज्यामुळे दक्षिणपूर्व आशियातील महत्वाची बौद्ध ठिकाणे भारतातील महत्वाच्या बौद्ध स्थळांशी जोडली जातील. मला खूप आनंद होत आहे की भारत सरकार अनेक बौद्ध मंदिरे पुनरुज्जीवीत करण्याच्या कामात भागीदार आहे. यात शेकडो वर्षांपूर्वीचे  म्यानमारमधील बागान येथील सुंदर आनंद मंदिर देखील समाविष्ट आहे. आज, जगात सर्वत्र संघर्ष आणि मानवी दु: ख पहायला मिळते. भगवान बुद्धांची शिकवणूक द्वेषाला दयेने संपवण्याचा मार्ग दाखवते. मी जगभरातील भगवान बुद्धांवर श्रद्धा असणाऱ्या, करुणेच्या सिद्धांतावर विश्वास ठेवणाऱ्या – सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा देतो. संपूर्ण जगासाठी भगवान बुद्धांकडे आशीर्वाद मागतो, जेणेकरून आपण त्यांच्या शिकवणुकीवर आधारित एक शांतीपूर्ण आणि दयाळू जगाच्या निर्मितीची आपली जबादारी पूर्ण करू शकू. आज जेव्हा आपण भगवान बुद्धांचे स्मरण करतो. तुम्ही लाफिंग बुद्धाच्या मुर्तींबद्दल ऐकलेच असेल,  अशी मान्यता आहे की लाफिंग बुद्धा चांगले भाग्य घेऊन येते, परंतु फारच थोड्या लोकांना हे माहीत आहे की स्मायलिंग बुद्धा हे भारताच्या संरक्षण इतिहासातील एक महत्त्वाच्या घटनेशी देखील संबंधित आहेत. आता तुम्ही विचार करत असाल की स्मायलिंग बुद्ध आणि भारताची सैन्य शक्ती यांच्यात काय संबंध आहे? 20 वर्षांपूर्वी 11 मे 1998 रोजी संध्याकाळी भारताचे तत्कालीन पंतप्रधान श्री अटलबिहारी वाजपेयी यांनी देशाला संबोधित करताना सांगिलते होते, त्यांच्या शब्दांनी संपूर्ण देशाला गौरव,पराक्रम आणि आनंदाच्या क्षणांनी भरले. संपूर्ण जगभरात पसरलेल्या भारतीय समुदायामध्ये नवीन आत्मविश्वास निर्माण झाला होता. तो दिवस होता बुद्ध पौर्णिमेचा. 11 मे 1998 रोजी राजस्थानातील पोखरण येथे परमाणु चाचणी घेण्यात आली. त्या घटनेला 20 वर्ष पूर्ण होत आहेत आणि भगवान बुद्धांच्या आशीर्वादांसह बुद्ध पौर्णिमेला ही चाचणी केली गेली. भारताची चाचणी यशस्वी झाली आणि अशा प्रकारे भारताने विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात आपली ताकद दाखवून दिली. आम्ही असे म्हणू शकतो की तो दिवस भारताच्या इतिहासात त्याच्या लष्करी ताकदीच्या रुपात चिन्हांकित केला आहे. भगवान बुद्धांनी जगाला दाखवून दिले आहे की - शांततेसाठी आंतरिक शक्ती आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, जेव्हा एक देश म्हणून आपण बलवान होत असतो तेव्हा आपण प्रत्येकासोबत शांततापूर्ण मार्गाने वागतो. मे 1998 या महिन्यामध्ये आण्विक चाचण्या घेण्यात आल्या म्हणून केवळ हा महिना देशासाठी महत्त्वपूर्ण नाही, परंतु ज्याप्रकारे ह्या चाचण्या केल्या गेल्या हे महत्त्वाचे आहे. य घटनेने संपूर्ण जगाला हे दाखवून दिले की भारताची भूमी ही महान शास्त्रज्ञांची भूमी आहे आणि कणखर नेतृत्वासह भारत नवीन उंची प्राप्त करू शकतो. अटलबिहारी वाजपेयीजी यांनी "जय-जवान जय-किसान, जय-विज्ञान" हा मंत्र दिला होता. आपण 11 मे 1998 या दिवसाचा 20 वा  वर्धापनदिन साजरा करणार आहोत, तेव्हा भारताच्या शक्तीसाठी अटलजींनी आपल्याला जो,’जय विज्ञान’चा मंत्र दिला होता, त्याला आत्मसात करत आधुनिक भारताच्या निर्मितीसाठी, शक्तिशाली भारत निर्माण करण्यासाठी, सक्षम भारत निर्माण करण्यासाठी प्रत्येक युवकाने योगदान देण्याचा संकल्प करावा. आपल्या शक्तीला भारताच्या शक्तीमध्ये सहभागी करा. जो प्रवास अटलजींनी सुरु केला होता, त्याला पुढे घेऊन जाण्याचा एक नवीन आनंद, नवीन समाधान आपण देखील प्राप्त करू शकू.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, पुढील ‘मन की बात’ कार्यक्रमात भेटूया आणि अजून गप्पा मारुया.

 खूप खूप धन्यवाद!

 

 

B.Gokhale/AIR/D.Rane



(Release ID: 1530691) Visitor Counter : 246


Read this release in: English