सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
अली यावर जंग राष्ट्रीय वाणी आणि श्रवण दिव्यांगत्व संस्थेतर्फे समावेशकता आणि विकसित भारत 2047 या संकल्पनेवर आधारित 80वा स्वातंत्र्यदिन साजरा
Posted On:
15 AUG 2026 1:10PM by PIB Mumbai
अली यावर जंग राष्ट्रीय वाणी आणि श्रवण दिव्यांगत्व संस्था, मुंबई येथे 80वा स्वातंत्र्यदिन देशभक्तीच्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. यावर्षीच्या राष्ट्रीय संकल्पनेनुसार, विकसित भारत@2047 साठी युवा शक्ती या विषयावर आधारित हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. अधिकारी, निमंत्रित पाहुणे, कर्मचारी, विद्यार्थी, वाणी, भाषा आणि श्रवण दिव्यांगत्व असलेल्या व्यक्ती तसेच त्यांचे कुटुंबीय या सोहळ्यात सहभागी झाले.
कार्यक्रमाची सुरुवात अली यावर जंग राष्ट्रीय वाणी आणि श्रवण दिव्यांगत्व संस्था (दिव्यांगजन), मुंबईच्या संचालक डॉ. सुमन कुमार यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावून करण्यात आली. त्यानंतर भारतीय सांकेतिक भाषेत राष्ट्रगीत सादर करण्यात आले. या उपक्रमामुळे श्रवण दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींना राष्ट्रीय सोहळ्यात पूर्णपणे सहभागी होता आले.

श्रवणविज्ञान विभागाचे व्याख्याते शमीम अन्सारी यांनी आपल्या मनोगतात स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे स्मरण केले आणि विविध क्षेत्रांमध्ये भारताने केलेल्या प्रगतीवर प्रकाश टाकला. देश स्वातंत्र्याची शंभर वर्षे पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना, विकसित भारताची संकल्पना प्रत्येक नागरिकाला मूलभूत गरजा, सन्मान आणि सुरक्षित जीवन उपलब्ध करून देणारी असली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

डॉ. सुमन कुमार यांनी उपस्थित त्यांना संबोधित करताना सुलभ आणि सर्वसमावेशक संवादाला चालना देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल इंडिया आणि भाषिणी व्यासपीठाच्या वाढत्या भूमिकेवर प्रकाश टाकला. आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी सप्तधारा या संकल्पनेच्या दृष्टिकोनावरही त्यांनी प्रकाश टाकला आणि अधिक सुलभता व सर्वसमावेशकतेच्या दिशेने योगदान देण्याचे आवाहन सर्व संबंधित घटकांना केले. त्यांनी नाविन्यपूर्ण उपाय विकसित करण्यासाठी, सुलभता सुधारण्यासाठी आणि दिव्यांग व्यक्तींसाठी अधिक संधी निर्माण करण्यासाठी उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज अधोरेखित केली. नाविन्य, समावेशकता, तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर आणि समर्पित सेवेद्वारे राष्ट्रनिर्मितीत योगदान देण्यासाठी त्यांनी युवक आणि इतर संबंधित घटकांना प्रोत्साहित केले.
या सोहळ्यात विद्यार्थी, कर्मचारी, दिव्यांग व्यक्ती, त्यांचे कुटुंबीय आणि इतर संबंधित घटकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे समन्वयन छंदसी अनारसे आणि जशवंत सिंह यांनी केले. 2047 पर्यंत विकसित भारताची संकल्पना साकार करण्यासाठी तसेच समावेशक समाजाच्या निर्मितीसाठी योगदान देण्याच्या संस्थेच्या बांधिलकीचा या कार्यक्रमातून पुनरुच्चार करण्यात आला.
***
नितीन फुल्लुके / राज दळेकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2299918)
अभ्यागत कक्ष : 38