राष्ट्रीय मानवाधिकार आयोग
महाराष्ट्रात नांदेड येथील चार मुलांच्या मृत्यूप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने स्वतःहून दखल घेतली
महापालिका आयुक्त, जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना नोटिसा बजावल्या, दोन आठवड्यांच्या आत सविस्तर अहवाल मागवला
Posted On:
24 APR 2026 6:29PM by PIB Mumbai
मुंबई, 24 एप्रिल 2026
महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील इस्लामपुरा भागात 16 एप्रिल 2026 रोजी बांधकाम सुरू असलेल्या एका नाल्याजवळच्या खोल खड्ड्यात बुडून चार मुलांचा मृत्यू झाल्याच्या माध्यमांमधील वृत्ताची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने स्वतःहून दखल घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक नागरी संस्थेकडून नाल्याचे बांधकाम सुरू होते आणि जवळच्या अंदाजे 15 फूट खोल खड्ड्यात सांडपाणी साचले होते. घटनास्थळाजवळ खेळत असलेल्या मुलांनी, पाण्याचा अंदाज न घेताच त्यात प्रवेश केल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडल्याचे यात म्हटले आहे.
आयोगाने असे निरीक्षण नोंदवले आहे की, सदर बातमीतील मजकूर खरा असेल, तर यामधून पीडितांच्या मानवी हक्कांच्या उल्लंघनाचा गंभीर मुद्दा उपस्थित होतो. त्यानुसार, आयोगाने नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त, जिल्हा दंडाधिकारी आणि नांदेडचे पोलीस अधीक्षक यांना नोटिसा बजावल्या आहेत.
संबंधित अधिकाऱ्यांना या प्रकरणाबाबत दोन आठवड्यांच्या आत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या अहवालात, इतर बाबींसह, पीडित व्यक्तींच्या आरोग्याची त्यावेळची स्थिती आणि पीडित व्यक्तीच्या नातेवाईकांना जर काही भरपाई देण्यात आली असेल, तर त्याबाबतचे तपशील समाविष्ट करणे अपेक्षित आहे.
प्रसारमाध्यमांनी 17 एप्रिल 2026 रोजी दिलेल्या वृत्तानुसार, मदतीसाठी आरडाओरड ऐकून स्थानिक रहिवासी आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी धावून गेले आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले. तथापि, त्यांच्या प्रयत्नांनंतरही मुलांना वाचवता आले नाही.
संबंधित अधिकाऱ्यांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर, आयोग या प्रकरणाची पुढील तपासणी करेल.
* * *
पीआयबी मुंबई | निलिमा चितळे/राजश्री आगाशे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2255382)
अभ्यागत कक्ष : 50