रेल्वे मंत्रालय
भारतीय रेल्वेकडून महाराष्ट्र आणि कोकण विभागात संपर्कव्यवस्था आणि 'अमृत भारत' उपक्रमांचा विस्तार
पुणे-मडगाव सेक्टर रेल्वे सेवांनी जोडला; देशभरात 60 अमृत भारत एक्सप्रेस गाड्या कार्यान्वित
अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 132 स्थानकांची निवड; 17 स्थानकांचे काम पूर्ण
Posted On:
27 MAR 2026 7:41PM by PIB Mumbai
मुंबई, 27 मार्च 2026
भारतीय रेल्वेने महाराष्ट्र, गोवा आणि कोकण विभागावर विशेष लक्ष केंद्रित करून देशभरात प्रवासी संपर्कव्यवस्था मजबूत करणे आणि मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्याचे काम सुरू ठेवले आहे.
अमृत भारत एक्सप्रेस सेवांसह नवीन रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी भारतीय रेल्वेला संसद सदस्य, लोकप्रतिनिधी, रेल्वे प्रवासी आणि इतर भागधारकांकडून रेल्वे बोर्ड, झोनल रेल्वे आणि विभागीय कार्यालय अशा विविध स्तरांवर औपचारिक आणि अनौपचारिक प्रस्ताव, विनंत्या आणि सूचना प्राप्त होत असतात. ही एक निरंतर आणि गतिमान प्रक्रिया असल्याने अशा विनंत्यांचा कोणताही मध्यवर्ती संग्रह ठेवला जात नाही. या प्रस्तावांची वेळोवेळी तपासणी केली जाते आणि व्यवहार्यता व आवश्यकतेनुसार कार्यवाही केली जाते.
रेल्वेचे जाळे प्रादेशिक सीमांच्या पलीकडे विस्तारलेले असल्याने, संपूर्ण नेटवर्कच्या गरजांवर आधारित रेल्वे सेवा सुरू केल्या जातात. सध्या, पुणे-मडगाव विभागासाठी खालील रेल्वे सेवा उपलब्ध आहेत:
- पुणे-एर्नाकुलम पूर्णा एक्सप्रेस
- पुणे-एर्नाकुलम एक्सप्रेस
या सेवा महाराष्ट्र, गोवा आणि दक्षिण भारतात प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या गरजा पूर्ण करतात, तसेच कोकण पट्ट्यातील प्रमुख स्थानकांना देखील जोडतात. कोणत्याही मार्गावर किंवा विभागावर रेल्वे सेवा सुरू करणे ही एक निरंतर प्रक्रिया असून ती खालील अनेक परिचालन घटकांवर अवलंबून असते:
- विभागाची क्षमता
- रेल्वे मार्गांची उपलब्धता
- आवश्यक रोलिंग स्टॉकची उपलब्धता
- जुळणाऱ्या पायाभूत सुविधांची उपलब्धता
- रूळ आणि इतर रेल्वे मालमत्तेच्या देखभालीची आवश्यकता
23 मार्च 2026 पर्यंत, भारतीय रेल्वेच्या जाळ्यामध्ये एकूण 60 अमृत भारत एक्सप्रेस सेवा कार्यरत आहेत. या गाड्या महाराष्ट्र, दिल्ली, पूर्व भारत, दक्षिण राज्ये आणि ईशान्य भारतासह देशातील प्रमुख प्रदेशांना जोडतात, ज्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासाचे पर्याय लक्षणीयरीत्या सुधारले आहेत.
अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांची रचना परवडणारा, आरामदायी आणि आधुनिक प्रवास प्रदान करण्याच्या दृष्टीकोनातून तयार करण्यात आली आहे, ज्या विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवाशांची सोय करतात आणि प्रमुख आर्थिक व सांस्कृतिक केंद्रांमधील कनेक्टिव्हिटी वाढवतात.
अमृत भारत रेल्वे स्थानक योजना
रेल्वे स्थानकांचा दीर्घकालीन व सर्वसमावेशक पुनर्विकास करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने अमृत भारत स्टेशन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सविस्तर आराखडा तयार करून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी केली जात असल्यामुळे स्थानके आधुनिक व प्रवासी-अनुकूल केंद्रांमध्ये रूपांतरित होतील. आराखड्यात खालील बाबींचा समावेश आहे:
- स्टेशनला जाण्याचा रस्ता आणि आजूबाजूचा परिसर सुधारणे.
- स्थानकापर्यंत शहराच्या दोन्ही बाजूंनी सहज पोहोचता येईल अशी व्यवस्था करणे.
- स्थानकाची मुख्य इमारत आधुनिक करणे.
- प्रवाशांसाठी आरामदायी बसण्याची जागा, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी उपलब्ध करणे
- मोठे पादचारी पूल/ प्रवासी वर्दळीनुसार वरून जाणारे मार्ग.
- लिफ्ट, एस्कलेटर, रॅम्प सुविधा.
- फलाट सुधारणा आणि छप्पर घालणे.
- ‘वन स्टेशन वन प्रॉडक्ट’ सारख्या उपक्रमांतर्गत किऑस्क
- पार्किंग व वाहतूक जोडणी
- दिव्यांगांसाठी विशेष सुविधा
- प्रगत माहिती प्रणाली
- आरामदायी लाउंज, व्यवसायासाठी जागा आणि परिसर सुंदर करणे.
या योजनेत शाश्वत व पर्यावरणपूरक उपायांवरही भर दिला आहे. स्थानके आधुनिक, पर्यावरणपूरक आणि टिकाऊ बनवणाऱ्या या योजनेत आवश्यक तिथे बॅलास्टलेस ट्रॅकचा समावेश आहे.या योजनेअंतर्गत देशभरात 1,338 स्थानके निश्चित केली असून त्यापैकी 132 स्थानके महाराष्ट्रात आहेत. यात उपनगरी, प्रादेशिक आणि जंक्शन स्थानकांच्या विस्तृत जाळ्याचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील निश्चित केलेली स्थानके अशी: अहमदनगर, अजनी (नागपूर), अक्कलकोट रोड, अकोला, आकुर्डी, अमळनेर, अमगाव, अमरावती, अंधेरी, बडनेरा, बल्लारशाह, वांद्रे टर्मिनस, बारामती, बेलापूर, भंडारा रोड, भोकर, भुसावळ, बोरीवली, भायखळा, चाळीसगाव, चंदा फोर्ट, चंद्रपूर, चर्नी रोड, छत्रपती संभाजीनगर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, चिंचपोकळी, चिंचवड, दादर (मध्य रेल्वे), दादर (पश्चिम रेल्वे), दहिसर, दौंड, देहू रोड, देवळाली, धामणगाव, धरणगाव, धाराशिव, धर्माबाद, धुळे, दिवा, दुधणी, गंगाखेड, गोधनी, गोंदिया, ग्रँट रोड, हडपसर, हातकणंगले, हुजूर साहिब नांदेड, हिमायतनगर, हिंगणघाट, हिंगोली डेक्कन, इगतपुरी, जळगाव, जालना, जोगेश्वरी, कल्याण जंक्शन, कामठी, कांदिवली, कांजूर मार्ग, कराड, काटोल, केडगाव, किनवट, कोपरगाव, कुर्डूवाडी जंक्शन, कुर्ला जंक्शन, लासलगाव, लातूर, लोकमान्य टिळक टर्मिनस, लोणंद जंक्शन, लोणावळा, लोअर परेल, मालाड, मलकापूर, मनमाड जंक्शन, , मरीन लाइन्स, माटुंगा, मिरज जंक्शन, मुदखेड जंक्शन, मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन, मुंब्रा, मुर्तिजापूर जंक्शन, नगरसोल, नागपूर जंक्शन, नांदगाव, नांदुरा, नंदुरबार, नारखेड जंक्शन, नाशिक रोड, नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी जंक्शन, पाचोरा जंक्शन, पालघर, पंढरपूर, पनवेल जंक्शन, परभणी जंक्शन, परेल, परळी वैजनाथ, पार्टूर, फलटण, प्रभादेवी, पुलगाव जंक्शन, पुणे जंक्शन, पूर्णा जंक्शन, रावेर, रोटेगाव, साईनगर शिर्डी, सँडहर्स्ट रोड, सांगली, सातारा, सावदा, सेलू, सेवाग्राम, शहाड, शेगाव, शिवाजी नगर पुणे, श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर, सोलापूर, तळेगाव, ठाणे, ठाकुर्ली, टिटवाळा, तूमसर रोड, उमरी, उरुळी, वडाळा रोड, विद्याविहार, विक्रोळी, वर्धा, वाशीम आणि वाठार.
पूर्ण झालेली स्थानके
महाराष्ट्रातील पुढील 17 स्थानकांवर पुनर्विकासाची कामे पूर्ण झाली आहेत.
आमगाव, बारामती, चांदा फोर्ट, चिंचपोकळी, देवळाली, धुळे, केडगाव, लासलगाव, लोणंद जंक्शन, माटुंगा, मुर्तीजापूर जंक्शन, नांदुरा, नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी जंक्शन, परेल, सावदा, शहाड आणि वडाळा रोड.
प्रमुख स्थानकांवर सुरू असलेले काम
इतर स्थानकांवरील विकास कामे सुरू आहेत. निवडक स्थानकांवरील कामाची प्रगती:
- दिवा: स्थानाकाची इमारत, येण्या-जाण्याचा परिसर आणि पार्किंग सुविधा यांचे आधुनिकीकरण, नवीन प्रवेशद्वार, फलाट सुधारणा, फलाटावरील निवारा, शौचालय आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पूर्ण झाले. नवीन पादचारी पुलाचे काम सुरू आहे.
- मुंब्रा: फलाटावरील सुधारणा, आसनव्यवस्था, स्वच्छतागृह संकुल, आरक्षण कार्यालय आणि परिसरातील मोकळ्या जागेच्या आधुनिकीकरणाचे काम पूर्ण झाले. सरकत्या जिन्यांच्या (एस्कलेटर) उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे.
- पालघर: फलाटाचे पृष्ठभाग सपाटीकरण, निवारा शेडची कामे पूर्ण, पादचारी पुलाचे बांधकाम सुरू.
- टिटवाळा: स्थानकाची इमारत, प्रवेशद्वार, तिकीट सुविधा, फलाटाचा पृष्ठभाग आणि जोड रस्त्यांमध्ये सुधारणा, पादचारी पुलाचे काम प्रगतीपथावर.
- विक्रोळी: स्थानकाची इमारत, फलाटाचा पृष्ठभाग, निवारा आणि स्वच्छता सुविधांचे आधुनिकीकरण करण्यात आले, नवीन आरक्षण कार्यालय, येण्या-जाण्याचा परिसर आणि वाहनतळ विकासाचे काम प्रगतीपथावर आहे.
कोकण विभागातील संपर्क व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी, महत्त्वाच्या पायाभूत सुविधांची कामे हाती घेण्यात आली आहेत. पनवेल–रोहा दुपदरीकरण प्रकल्प (75 किमी) कार्यान्वित करण्यात आला असून, यामुळे या महत्त्वाच्या मार्गाची क्षमता वाढली, परिचालन कार्यक्षमता सुधारली, आणि रेल्वे वाहतूक अधिक सुरळीत झाली.
महाराष्ट्र मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, दक्षिण मध्य रेल्वे आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या अधिकारक्षेत्रात येतो.
या क्षेत्रांसाठी :
- आर्थिक वर्ष 2025-26 साठी 3,834 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.
- फेब्रुवारी 2026 पर्यंत 3,886 कोटी रुपये खर्च करण्यात आले.
अमृत भारत स्थानक योजनेंतर्गत कामांसह, स्थानक पुनर्विकास आणि प्रवासी सुविधांच्या कामांसाठी सामान्यतः प्लॅन हेड -53 'कस्टमर अमेनिटीज', अंतर्गत निधी दिला जातो आणि त्याचे वाटप विभागनिहाय केले जाते.
रेल्वे पायाभूत सुविधांचा विकास, पुनर्विकास, श्रेणीसुधारणा आणि आधुनिकीकरण ही एक निरंतर व प्राधान्यक्रम-आधारित प्रक्रिया असून, स्थानकाची श्रेणी, प्रवासी वाहतूक, परिचालनविषयक गरजा आणि निधीची उपलब्धता या बाबी लक्षात घेऊन हे काम हाती घेतले जाते.
रेल्वे प्रकल्पांना, वाहतुकीचे अंदाज, कनेक्टिव्हिटीच्या गरजा, सामाजिक-आर्थिक लाभ, परिचालनविषयक गरजा आणि संबंधित भागधारकांचे अभिप्राय यांसारख्या विविध घटकांचा योग्य विचार केल्यानंतर, तसेच नीती (NITI) आयोग आणि वित्त मंत्रालय यांसारख्या संस्थांकडून आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतर मान्यता दिली जाते.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली.
* * *
पीआयबी मुंबई | निलिमा चितळे/शैलेश पाटील/राजश्री आगाशे/प्रज्ञा जांभेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2246294)
अभ्यागत कक्ष : 48