दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
इंडिया पोस्ट आणि वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई यांनी एमएसएमई आणि उद्योजकांना सक्षम करण्यासाठी ऐतिहासिक सामंजस्य करारावर केली स्वाक्षरी
प्रविष्टि तिथि:
20 AUG 2025 9:42PM by PIB Mumbai
मुंबई, 20 ऑगस्ट 2025
इंडिया पोस्ट आणि वर्ल्ड ट्रेड सेंटर (डब्ल्यूटीसी), मुंबई यांनी आज एमएसएमई आणि उद्योजकांवर विशेष भर देत भारतीय उद्योगांसाठी जागतिक बाजारपेठेत प्रवेश अधिक सुलभ करण्यासाठी एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

निर्यातीला चालना देण्यासाठी, सीमेपलिकडे भागीदारी सुलभ करण्यासाठी आणि भारतीय उद्योगांना आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तार करण्यासाठी सक्षम बनवण्यासाठी या धोरणात्मक सहकार्यामुळे इंडिया पोस्टचे विस्तृत पोस्टल नेटवर्क डब्ल्यूटीसी मुंबईच्या जागतिक व्यापार कौशल्याशी जोडले गेले आहे.
टपाल विभाग, त्याच्या विस्तृत नेटवर्कसह, देशभरात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय टपाल सेवा प्रदान करतो. आपल्या आंतरराष्ट्रीय सुविधांद्वारे, हा विभाग निर्यातदारांना सीमाशुल्क आणि निर्यात अनुपालनात मदत करतो, ज्यामध्ये इनव्हॉइस आणि निर्यात घोषणापत्र यासारख्या अनिवार्य कागदपत्रांचा समावेश आहे.
सामंजस्य करारावरील स्वाक्षरी समारंभाला नवी मुंबई विभागातील पोस्टमास्टर जनरल सुचिता जोशी; महाराष्ट्र सर्कलचे सहाय्यक पोस्टमास्टर जनरल (व्यवसाय विकास) डॉ. सुधीर जाखेरे आणि डब्ल्यूटीसी मुंबईचे अध्यक्ष डॉ. विजय कलंत्री उपस्थित होते.
याप्रसंगी, महाराष्ट्र सर्कलचे सहाय्यक पोस्टमास्टर जनरल (व्यवसाय विकास) डॉ. सुधीर जाखेरे यांनी लॉजिस्टिक्स आणि निर्यात सुविधा मजबूत करण्याच्या उद्देशाने इंडिया पोस्टच्या मुंबईतील आंतरराष्ट्रीय व्यवसाय केंद्र, राष्ट्रीय लॉजिस्टिक्स संघटना आणि डाक घर निर्यात केंद्रे यासारख्या उपक्रमांचा उल्लेख केला. 70 हून अधिक देशांमध्ये कार्यरत तसेच महाराष्ट्राच्या अगदी दुर्गम भागांशी कनेक्टिव्हिटी असलेले इंडिया पोस्ट व्यापार, निर्यात आणि समावेशक वाढीचा एक प्रमुख चालक म्हणून उदयास येत आहे.

डब्ल्यूटीसी मुंबईचे अध्यक्ष डॉ. विजय कलंत्री यांनी या भागीदारीबद्दल आनंद व्यक्त केला आणि इंडिया पोस्टच्या कनेक्टिव्हिटी आणि सेवांबद्दल व्यापार आणि उद्योग क्षेत्रात जागरूकता निर्माण करण्यासाठी डब्ल्यूटीसी मुंबई सक्रियपणे मदत करेल यावर त्यांनी भर दिला. ते म्हणाले की दोन्ही संस्था लॉजिस्टिक्स आणि व्यापार सुलभीकरणात इंडिया पोस्टची महत्त्वाची भूमिका दर्शविणारे कार्यक्रम संयुक्तपणे आयोजित करतील.

या समारंभाला डब्ल्यूटीसी मुंबईचे उपाध्यक्ष कॅप्टन सोमेश बत्रा; AIAI च्या वरिष्ठ संचालक संगीता जैन; डब्ल्यूटीसी मुंबईच्या संचालक प्रिया पानसरे; आणि निर्यात प्रोत्साहन पथकाचे सदस्य विपुल मंडलेशा उपस्थित होते.
या सहकार्यामुळे भारतीय उद्योगांसाठी नवीन जागतिक संधी निर्माण होतील आणि भारताला आंतरराष्ट्रीय व्यापार आणि उद्योजकतेचे केंद्र बनवण्याच्या स्वप्नांच्या दिशेने हातभार लागेल अशी अपेक्षा आहे. यामुळे निर्यातदारांना, विशेषतः लघु आणि मध्यम उद्योगांना टपाल विभागाच्या निर्यात सुविधा सेवा आणि डब्ल्यूटीसी मुंबईच्या प्रशिक्षण आणि नेटवर्किंग परिसंस्थेचा लाभ घेता येईल, ज्यामुळे जागतिक व्यापारात भारताचा सहभाग बळकट होईल.
निलीमा चितळे/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2158728)
आगंतुक पटल : 31
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English