अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

2047 पर्यंत भारताच्या  विकसित राष्ट्राच्या जडणघडणीत  भारतीय राजस्व सेवा - आयआरएसची भूमिका  महत्त्वाची - केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांचे  प्रतिपादन 


नागपुरातील प्रत्यक्ष कर अकादमी एनएडीटी येथे 77 व्या तुकडीतील भारतीय राजस्व सेवा- आयआरएसचा दीक्षांत समारंभ संपन्न

Posted On: 14 APR 2025 1:43PM by PIB Mumbai

 

नागपूर 14 एप्रिल 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे ध्येय समोर ठेवले असून या विकसित राष्ट्राच्या जडणघडणीत  भारतीय राजस्व सेवा - आयआरएसची भूमिका ही महत्त्वाची असणार आहे असे प्रतिपादन केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी आज केले.नागपुरातील प्रत्यक्ष कर अकादमी एनएडीटी येथे 77 व्या तुकडीतील भारतीय आयआरएसच्या दीक्षांत समारंभा प्रसंगी तसेच सेवापूर्व प्रशिक्षणाच्या समारोपाच्या प्रसंगी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते .याप्रसंगी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे सदस्य प्रबोध सेठ,   प्रधान  महासंचालक   संजय बहादूर  , एनएडीटीचे महासंचालक पी. सेल्वगणेश तसेच अकादमीचे अतिरिक्त महासंचालक मुनिष कुमार, सीतारमप्पा कप्पट्टणवार ,77 व्या तुकडीचे प्रशिक्षण संचालक प्रदीप एस प्रामुख्याने उपस्थित होते . याप्रसंगी रॉयल भूतान सेवेच्या 2 अधिकाऱ्यांसह 84 आयआरएस अधिकारी प्रशिक्षणार्थींनी 16 महिन्यांचे सेवा पूर्व प्रशिक्षण यशस्वीरित्या  पूर्ण केल्यानंतर कर प्रशासकाची शपथ घेतली.

केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी भारतीय राजस्व सेवेचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, भारत ही वेगाने वाढणाऱ्या निवडक अर्थव्यवस्था पैकी एक अर्थव्यवस्था असून   देशाच्या वित्तीय प्रशासनाचा  भारतीय राजस्व सेवा हा कणा आहे. भारतीय राजस्व सेवेतील अधिकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे कर अनुपालनमहसूल चुकवेगिरीला आळा तसेच  सहकारी संघवाद यांना चालना मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले .करसंकलनाच्या कार्यामध्ये अधिक दक्षता आणि पारदर्शकता येण्यासाठी डाटा मायनिंग ,ब्लॉकचेन, कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे प्रत्यक्ष कर संकलनाला एक नवे रूप मिळाले असल्याचे त्यांनी  नमुद केले .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मागील  10 वर्षात अनेक लोकोपयोगी योजना ज्यामध्ये स्टार्टअप ,मुद्रा, आवास योजना, आयुष्मान भारत योजना यांचा समावेश आहे  यशस्वीरित्या राबवल्या  जात असल्याचे सांगून गेल्या  8 एप्रिलला मुद्रा या योजनेला  10 वर्ष पूर्ण झाले असून या अंतर्गत 52 कोटी लोकांना 33 लाख कोटी रुपये  विनातारण कर्ज वितरण केले आहे असे चौधरी यांनी स्पष्ट केले.   मुद्रा योजनेच्या माध्यमातून 68 टक्के लाभार्थी महिलांनी या कर्ज योजनेचा फायदा घेत आपला व्यवसाय उभारून आत्मनिर्भर झाले असल्याचेही त्यांनी सांगितले. 

याप्रसंगी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे सदस्य प्रबोध सेठ यांनी सांगितले की देशातील एकूण कर संकलनामध्ये 50 टक्के वाटा हा प्रत्यक्ष कराचा असून गेल्या आर्थिक वर्षात  9 कोटी  कर भरणा   नागरिकांनी केला असून  हे सर्व रिटर्न्स    वेळेत प्रोसेस केले गेले आहेत. याप्रसंगी राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या प्रशिक्षण विभागाचे प्रधान महासंचालक संजय बहादूर यांनी   77 व्या तुकडीतील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना कर प्रशासकाची प्रतिज्ञा दिली . या 16 महिन्याच्या सेवापुर्व प्रशिक्षणामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणा-या  समीर राजा या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष कर , अ‍ॅडवान्स अकाऊंटींग तसेच इतर विषयातील चांगल्या गुणांसाठी सर्वाधिक सुवर्णपदके मिळाली तसेच मानाचे अर्थमंत्री सुवर्णपदक सुद्धा मिळाले.

 

या कार्यक्रमाला आयकर विभागातील वरिष्ठ अधिकारी ,77 व्या आणि 78 व्या तुकडीतील प्रशिक्षणार्थी अधिकारी त्यांचे कुटुंबीय तसेच राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीतील अधिकारी   मोठ्या संख्येने उपस्थित होते.

***

DW/DD/PK

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2121560)
Read this release in: English