नौवहन मंत्रालय

जेएनपीए इथे प्रजासत्ताक दिन देशभक्तीपर वातावरण आणि उत्साहात झाला साजरा

Posted On: 26 JAN 2024 4:40PM by PIB Mumbai

नवी मुंबई, 26 जानेवारी 2024

 

नवी मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण या देशातील आघाडीच्या मालवाहू बंदर परिसरात, आज प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपर वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व उपस्थितांना संस्मरणीय आणि रंगतदार अनुभव देणारा असा हा भरगच्च कार्यक्रमांनी भरलेला सोहळा होता.

जेएनपीएचे प्रभारी अध्यक्ष आणि आजच्या सोहळ्याचे सन्माननीय प्रमुख पाहुणे, आयआरएस अधिकारी, उन्मेष वाघ यांच्या हस्ते तिरंगा ध्वज वंदन करून या  उत्सवाची सुरुवात झाली. वाघ यांच्यासह,  विविध विभागांचे प्रमुख, कामगार विश्वस्त, कर्मचारी, हितधारक आणि त्यांचे कुटुंबीयही या सोहळ्याला उपस्थित होते. राष्ट्रगीताची धून वाजवतांना, संपूर्ण परिसरातच देशभक्तीचे सूर वाहू लागले. सर्व उपस्थितांनी एकमुखाने आणि अभिमानाने राष्ट्रगीत गायले.

त्यानंतर  सीआयएस एफच्या अधिकाऱ्यांनी आकर्षक असा डॉग शो सादर केला, त्यासोबतच, थरारक शूटिंग प्रात्यक्षिकाचा अनुभवही उपस्थितांनी घेतला. यावेळी स्वातंत्र्य आणि शांततेचे प्रतीक म्हणून काही पक्षीही आकाशात सोडण्यात आले.

उन्मेष वाघ यांनी यावेळी श्रोत्यांना भावपूर्ण मार्गदर्शन केले. प्रजसत्ताक दिनाचे महत्त्व सांगतांना ते म्हणाले, "आपल्या महान राष्ट्राला आकार देणाऱ्या मूल्यांचे स्मरण करण्याचा दिवस म्हणून प्रजासत्ताक दिनाला खूप महत्त्व आहे. आज इथे उपस्थितांच्या देशाविषयीच्या भावना आणि उत्साह यांचा साक्षीदार होण्याची संधी मिळणे हे माझे सौभाग्य आहे. आपली समृद्ध संस्कृती आणि भारताला विशेष देश बनवणारे आपले आदर्श, यांचा हा उत्सव साजरा करण्यासाठी आपण एकत्र येऊया.  जेएनपीए मधील या उत्सवात सहभागी होण्यास मिळाले, याचा  मला अभिमान आहे, "

ध्वजवंदनानंतर, सेंट मेरीज स्कूल आणि आरकेएफ, जेएनपी विद्यालयातील प्रतिभावान विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमातूनही, हीच देशभक्तीची भावना व्यक्त झाली. एका सार्वभौम आणि समृद्ध भारताच्या आदर्शांचा यथोचित सन्मान ठेवणाऱ्या, या सोहळ्यात, जेएनपीए च्या संपूर्ण परिवाराने अत्यंत उत्साह आणि कटिबद्धतेने सहभाग नोंदवला होता

जेएनपीए विषयी माहिती:

जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (जेएनपीए), भारतातील कंटेनर हाताळणाऱ्या प्रमुख बंदरांपैकी एक आहे. 26 मे 1989 रोजी त्याची स्थापना झाल्यापासून, जेएनपीएचे मोठ्या मालवाहतूक टर्मिनलवरून देशातील प्रमुख कंटेनर मालवाहू बंदर म्हणून रूपांतर झाले आहे.

सध्या जेएनपीए इथे पाच कंटेनर टर्मिनल कार्यरत आहेत. त्यात, एनएसएफटी, एनएसआयसीटी., एनएसआयजीटी, बीएमसीटी. आणि एपीएमटी यांचा समावेश आहे . त्याशिवाय, बंदरात सामान्य मालवाहतुकीसाठी उथळ पाण्यातील बर्थही आहे. तसेच, बीपीसीएल.-आय. ओसीएल. समूह आणि नव्याने बांधण्यात आलेल्या किनारपट्टीच्या बर्थद्वारे व्यवस्थापित केले जाणारे आणखी एक द्रव मालवाहतूक टर्मिनल देखील इथे आहे.

277 हेक्टर जमिनीवर विकसित जेएनपीए इथून, भारतातील निर्यात-केंद्रित उद्योगांना चालना देण्यासाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधांसह विकसित केलेला बहु-उत्पादन एसईझेड प्रकल्प देखील चालवला जातो.

 

* * *

PIB Mumbai | S.Bedekar/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1999895) Visitor Counter : 54


Read this release in: English