माहिती आणि प्रसारण मंत्रालय

हर घर (घरोघरी) तिरंगा या अभियानाच्या माध्यमातून आधुनिक आणि शक्तिशाली भारताचे दर्शन जगाला घडेल- केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील


आगाखान पॅलेस येथे स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार

Posted On: 12 AUG 2022 3:03PM by PIB Mumbai

पुणे , 12 ऑगस्ट 2022
 

 

हर घर (घरोघरी) तिरंगा या अभियानाच्या माध्यमातून आधुनिक आणि शक्तिशाली भारताचे दर्शन जगाला घडेल असा विश्वास केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आज पुण्यात व्यक्त केला. ऐतिहासिक वारसा स्थळ असणाऱ्या आगाखान पॅलेस मध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय ध्वजारोहण आणि स्वातंत्र्य सैनिक गौरव समारंभात ते बोलत होते .स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांचे मोल देऊन या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले , त्यांच्या या त्यागाची माहिती आजच्या तरुण पिढीला व्हावी आणि त्यापासून त्यांना प्रेरणा घेता यावी यासाठी केंद्र सरकारने ‘हर घर (घरोघरी) तिरंगा ’ या अभियानाचे  आयोजन केलं असून त्यामुळं स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव खऱ्या अर्थानं साजरा होणार असल्याचं श्री . पाटील म्हणाले.


 

 

या कार्यक्रमाला राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील, पंचायतराज मंत्रालयाचे आर्थिक सल्लागार विजय कुमार बेहरा, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पुरातत्व विभागाचे अधीक्षक डॉ.राजेंद्र यादव, गांधी मेमोरियल सोसायटीच्या नीलम महाजन, आदी उपस्थित होते.


 
 

देशात 400 ठिकाणी अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून देशगौरवाची भावना निर्माण होईल. येणाऱ्या काळात आपल्या देशाला जगात अग्रेसर नेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहनही त्यांनी केले. स्वातंत्र्य लढ्यादरम्यान महात्मा गांधीजींचे आगाखान पॅलेसमध्ये वास्तव्य असल्याने ही वास्तू स्वातंत्र्य लढ्यासाठी प्रेरणादायी ठरली, असेही त्यांनी सांगितले .  

यावेळी बोलताना मंत्री श्री. चद्रकांत पाटील म्हणाले, की, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांनी पुढील तीन दिवस देशाला प्रेरणा देणारा तिरंगा ध्वज घरोघरी  फडकवावा, हे करताना ध्वजाचा सन्मान राखावा, असे आवाहन त्यांनी केले स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
 


मान्यवरांच्या हस्ते स्वातंत्र्य सैनिक, त्यांचे  कुटुंबीय व युद्धात वीर मरण आलेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. तत्पुर्वी केंद्रीय राज्यमंत्री श्री. पाटील आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कस्तुरबा गांधी आणि महादेवभाई देसाई यांच्या समाधीला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.


M.Iyengar/Somani/PM

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1851218) Visitor Counter : 147


Read this release in: English