महिला आणि बालविकास मंत्रालय
‘केंद्र सरकारची गेल्या आठ वर्षातील कामगिरी’ या विषयावर, केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती झुबिन इराणी यांच्या प्रमुख उपस्थितीत गोव्यात क्षेत्रीय बैठक
गोव्यात 60 नव्या अंगणवाड्या तसेच दक्षिण गोव्यात ‘एकल सुविधा केंद्र’ सुरु करण्याची घोषणा
गोव्यातील प्रत्येक तालुक्यात दोन मॉडेल अंगणवाडी असणार
प्रविष्टि तिथि:
12 JUN 2022 5:42PM by PIB Mumbai
‘केंद्र सरकारची गेल्या आठ वर्षातील कामगिरी’ या विषयावर, आज गोव्यात केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृत् झुबिन इराणी यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड, गोव्याचे महिला आणि बाल विकास मंत्री, विश्वजीत राणे यांची या बैठकीला उपस्थिती होती. महाराष्ट्र, गोवा, दादरा-नगरहवेली आणि दमण दीव चे प्रतिनिधीही बैठकीला उपस्थित होते.

“भारत सरकारच्या कामांना युनिसेफकडून प्रशस्तीपत्र मिळाले आहे, असे यावेळी स्मृती इराणी यांनी सांगितले. हे काम म्हणजे, समाजाची मोठीच सेवा आहे. ‘कामगिरीचे यश’ या शब्दांतच असा संदेश आहे की जेव्हा, महिला आणि बालकांच्या उत्थानाचा विषय येतो, तेव्हा त्यात, पुरुषांचा समान सहभाग अपेक्षित असतो. जेव्हा आपण बालकांच्या अधिकारांविषयी बोलतो, त्यावेळी, ते केवळ बालिकांविषयी नसते, तर त्यात मुलांचाही प्रश्न अध्याहृत असतो, असेही त्या पुढे म्हणाल्या.

गेल्या आठ वर्षातील सरकारच्या कामगिरीमधील एक महत्वाचे यश म्हणजे, बाल हक्क (काळजी आणि संरक्षण) कायदा, 2015 संसदेत, एकमताने संमत करुन घेणे, असे ईराणी यांनी सांगितले. यामुळे आता, जिल्हा प्रशासन आणि पोलीस अधीक्षकांच्या पूर्वपरवानगीनंतरच, बाल निगा/संगोपन संस्था स्थापन केल्या जाऊ शकतात. त्याशिवाय, सहकार्यात्मक संघराज्य व्यवस्था आणि सरकारचा सर्वांगीण दृष्टीकोन, या देखील गेल्या आठ वर्षातील सरकारच्या मोठ्या उपलब्धी आहेत, असे स्मृती इराणी म्हणाल्या.

सर्वांना न्याय देणे आणि गरजूंना मदत करणे, हे सरकारचे ध्येय आहे, असे त्यांनी सांगितले. आज एक कोटी 90 लाख महिला समुदाय सेवा क्षेत्रांत कार्यरत आहे. जगभरातील ही सर्वात मोठी संख्या असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या प्रयत्नांमुळे सुमारे, 2 कोटी आठ लाख महिला आज डिजिटली साक्षर झाल्या आहे. ग्रामपंचायतीत 15 लाख महिला प्रतिनिधी आणि 9 लाख आशा सेविका कार्यरत आहेत. पंतप्रधान मुद्रा योजनेच्या 70 टक्के लाभार्थी महिला आहेत. ही देशातील महिलांची मोठी यशोगाथा आहे, असे त्यांनी सांगितले.
आज देशभरात 708 वन स्टॉप सेंटर्स आणि स्रियांसाठी कार्यान्वित केलेले 35 हेल्पलाईन क्रमांक असून, यातून 70 लाख महिलांना आतापर्यंत मदत पुरवण्यात आली आहे.
'माय लाईफ- माय पॅड' योजना राबविल्याबद्दल स्मृती इराणी यांनी गोवा सरकारचे कौतुक केले. लाभार्थी महिलांसाठी बचतगटांच्या माध्यमातून सॅनिटरी पॅडस वितरित केली जातात.
गोवा मुक्तीच्या साठाव्या वर्षात राज्याला साठ नवीन अंगणवाड्या मिळतील, अशी घोषणा स्मृती इराणी यांनी केली. तसेच, राज्यातील प्रत्येक गट (ब्लॉकमध्ये) दोन मॉडेल (आदर्श) अंगणवाड्या स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारचे पाठबळ मिळेल. त्या आदर्श अंगणवाड्यांमध्ये अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि डिजिटल उपकरणे असतील, असेही त्या म्हणाल्या. दक्षिण गोव्यात आणखी एका नवीन वन स्टॉप सेंटरची घोषणाही त्यांनी केली.

केंद्रीय वित्तराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनीही या बैठकीत आपले विचार मांडले. "गेल्या आठ वर्षांत प्रशासनात केलेल्या सुधारणा आता कामगिरीच्या रूपाने प्रतिबिंबित होत आहेत." असे ते म्हणाले. "गेल्या आठ वर्षांतील सर्वात मोठ्या यशांमध्ये 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' च्या यशाची गणना होते. 'जन औषधी केंद्रांच्या' माध्यमातून स्रियांना 1 रुपयात सॅनिटरी पॅड मिळत आहेत. त्यामुळे देशाच्या ग्रामीण भागातील आरोग्यविषयक चित्र झपाट्याने बदलले आहे" असेही त्यांनी सांगितले.

गोव्याचे महिला व बालविकास मंत्री विश्वजीत राणे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "स्रियांच्या आणि बालकांच्या कल्याणासाठी सरकार, 'संपूर्ण प्रयत्न सरकारचे' अशा दृष्टीकोनातून सर्वतोपरी प्रयत्न करत आहे." त्याचप्रमाणे, सॅनिटरी पॅडशी संबंधित 'माय लाईफ-माय पॅड' या योजनेशी 3 लाख लाभार्थी जोडल्या गेल्या असल्याची माहितीही राणे यांनी दिली. नागरी हक्कांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांच्या सहकार्याने सरकार, बालकांच्या संरक्षणाकडे लक्ष पुरवत आहे, असेही ते म्हणाले.

गेल्या आठ वर्षांत महिला आणि बालविकास या क्षेत्रात करण्यात आलेल्या यशस्वी कामगिरीबद्दल युनिसेफने एक सादरीकरण केले. प्रधानमंत्री मुद्रा योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ, पोषण अभियान आणि महाराष्ट्र, गोवा, दादरा नगरहवेली आणि दमण-दीव मधील संबंधित योजनांच्या लाभार्थ्यांनी आपले अनुभव सांगितले. सरकारच्या पाठबळामुळे त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. समाजात आता त्यांना एक मानाचे स्थान मिळाले असल्याबद्दल समाधानाची भावना वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले.
***
S.Thakur/R.Aghor/J.Waishampayan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1833329)
आगंतुक पटल : 244
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English