अर्थ मंत्रालय
पणजी येथे 10 जून रोजी “बाजारातून संपत्ती निर्माण" विषयावर परिषदेचे आयोजन
केंद्रीय अर्थमंत्रालयांतर्गत असलेल्या गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त परिषद
केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांचा बेंगळुरु येथून परिषदेत सहभाग
सर्व राज्ये/ केंद्रशासित प्रदेशातील 75 शहरांमध्ये परिषदेचे आयोजन
प्रविष्टि तिथि:
09 JUN 2022 5:35PM by PIB Mumbai
पणजी, 9 जून 2022
“स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (AKAM)” साजरा करण्यासाठी, गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग (DIPAM) उद्या देशभरातील 75 शहरांमध्ये “बाजारातून संपप्तती निर्माण” या संकल्पनेवर आधारित परिषदेचे आयोजन करणार आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट देशाच्या 75 शहरांमधील नागरिकांना गुंतवणूक आणि संपत्ती निर्माण करण्याबद्दल तसेच नागरिकांचा आर्थिक विकास सुनिश्चित करण्यासाठी सरकारने उचललेल्या पावलांबद्दल माहिती देणे, प्रोत्साहन देणे आणि सक्षम करणे असा आहे.
केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहारमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन परिषदेसाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगळुरु येथून सहभागी होणार आहेत. तर, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत किसनराव कराड विज्ञान भवन, नवी दिल्ली येथून सहभागी होतील.
अध्यक्षीय भाषणानंतर 75 ठिकाणांवर आर्थिक विषयावरील तज्ज्ञांचे पुढील विषयांवर मार्गदर्शन होणार आहे.
- गेल्या 75 वर्षांतील भारतीय भांडवली बाजाराची वाढ.
- स्वतंत्र गुंतवणूकदार म्हणून महिलांचा उदय.
- बाजारपेठेचा आत्मविश्वास वृद्धिंगत करण्यासाठी सरकार आणि बाजारातील इतर घटकांची भूमिका.
- आर्थिक साक्षरता- आर्थिक समृद्धीचा मार्ग.
- अमृत काळात भारतीय भांडवल बाजाराचे भवितव्य
नॅशनल स्टॉक एक्स्चेंज, सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया आणि देशातील इतर आघाडीच्या वित्तीय संस्थांमधील प्रख्यात वक्ते आर्थिक साक्षरता आणि आर्थिक स्वातंत्र्याचा मार्ग या विषयावर पणजी कन्व्हेन्शन सेंटर येथे दुपारी 3.00 वाजेपासून माहितीसत्रास प्रारंभ होईल. जास्तीत जास्त नागरिकांनी परिषदेत सहभागी होऊन वित्तीय बाजार आणि गुंतवणूकीबद्दल माहिती घ्यावी, असे आवाहन डीआयपीएएमने केले आहे.
देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आणि भारतीय लोक, संस्कृती आणि कर्तृत्वाचा गौरवशाली इतिहास याच्या स्मरणार्थ देशात “आझादी का अमृत महोत्सव” साजरा केला जात आहे. 5000 वर्षांपेक्षा अधिक प्राचीन इतिहासाचा वारसा असलेल्या आपल्या देशाचा, सामूहिक कामगिरीचा हा उत्सव आहे. हा उत्सव पंतप्रधानांनी सांगितलेल्या पंचसूत्रीवर आधारित आहे. जन-भागीदारीच्या भावनेतून हा महोत्सव जन-उत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने लोकांमध्ये चांगल्या आणि सुलभ स्वीकार्हतेसाठी डीआयपीएएम 75 शहरांमध्ये सर्व प्रमुख भारतीय भाषांमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करत आहे.
* * *
PIB Panaji | S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1832660)
आगंतुक पटल : 154
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English