गृह मंत्रालय

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनी गुजरातमधील केवडिया येथे आयोजित कार्यक्रमाला केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री श्री अमित शहा यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून परेडकडून मानवंदना स्वीकारली


देशाचे पहिले गृहमंत्री आणि लोहपुरुष म्हणून प्रसिद्ध असलेल्या सरदार पटेल यांना स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली

Posted On: 31 OCT 2021 4:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 ऑक्टोबर 2021 


गुजरातमधील केवडिया येथे आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राष्ट्रीय एकता दिन कार्यक्रमाला केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री श्री अमित शहा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी देशाचे पहिले गृहमंत्री आणि लोहपुरुष म्हणून प्रसिद्ध असलेल्या सरदार पटेल यांना स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावर असल्याने यावेळी त्यांचा व्हिडिओ संदेश प्रसारित करण्यात आला.

श्री. शहा म्हणाले की, आज या राष्ट्रीय एकता दिवसाचेही वेगळे महत्त्व आहे कारण हा दिवस राष्ट्रीय एकता दिनाच्या अमृत महोत्सवाचाही आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवादरम्यान येणारा हा राष्ट्रीय एकता दिवस आपल्या सर्वांसाठी विशेष महत्त्वाचा आहे कारण स्वातंत्र्यानंतर जेव्हा इंग्रजांनी देशाचे विभाजन करण्याचा कट रचला होता तेव्हा भारत, पाकिस्तान आणि 550 हून अधिक संस्थाने वेगळी करून विखंडीत  देश करण्याची योजना होती जी अयशस्वी करून अखंड भारताचा संकल्प सरदार साहेबांनी केला होता.

स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा करण्यासाठी एकीकडे आपल्यासमोर 15 ऑगस्ट 1947 पासून आजपर्यंत अनेक यशस्वी उपक्रम, कर्तृत्व, संघर्ष आणि बलिदान आहे आणि त्याच बरोबरीने देशाची प्रगती कशी होईल याचा संकल्प करायचा आहे. दुसरीकडे, 1857 ते 1947 पर्यंत आपण स्वातंत्र्य लढा दिला, अनेक प्रकारचे स्वातंत्र्य लढे लढले गेले, अनेकांनी हौतात्म्य पत्करले, अशा सर्व ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहायची आहे, त्यांचे आणि त्यांच्या बलिदानाचे स्मरण करायचे आहे. या बलिदानाच्या भावनेतून प्रेरणा घेऊन मुले आणि तरुण पिढीला देश उभारणीत घडवायचे आहे, म्हणूनच आज या राष्ट्रीय एकता दिनाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. ते म्हणाले की, आज सरदार पटेल यांची जयंती आहे आणि मी आज सर्वांना सांगू इच्छितो की शतकांमध्ये एकच सरदार होऊ शकतो आणि एक सरदार शतकानुशतके दीप प्रज्वलित ठेवतो. सरदार साहेबांनी दिलेल्या प्रेरणेने हा देश अखंड ठेवण्याचे काम केले आहे आणि देशाला पुढे नेण्यासाठी त्यांची प्रेरणा देशाला एकजूट ठेवण्यात यशस्वी होत आहे.

   

केवडिया हे केवळ एका ठिकाणाचे नाव नाही, तर ते तीर्थक्षेत्र, राष्ट्रीय एकात्मतेचे आणि राष्ट्रवादाचे, देशभक्तीचे ठिकाण बनले आहे आणि सरदार साहेबांचा हा गगनचुंबी पुतळा संपूर्ण जगाला संदेश देत आहे कि भारताचे भविष्य उज्ज्वल आहे, भारताची एकता आणि अखंडता अबाधित आहे असे केंद्रीय गृहमंत्री म्हणाले. 

 

* * *

M.Chopade/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1768140) Visitor Counter : 244


Read this release in: English