संरक्षण मंत्रालय
स्वर्णिम विजय मशालीचे मुंबईत आगमन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेट वे ऑफ इंडिया इथे केले मशालीचे स्वागत
Posted On:
01 SEP 2021 8:47PM by PIB Mumbai
मुंबई, 1 सप्टेंबर 2021
- पश्चिम विभागाच्या मुख्य विजयी ज्योतीचे एक सप्टेंबर 21 रोजी मुंबईत आगमन
- 1971 च्या युद्धातील शौर्यचक्र पुरस्कार विजेत्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार
- भारतीय हवाई दलातर्फे हवाई मानवंदना आणि संयुक्त सेवांच्या बँडपथकाचा गेट वे ऑफ इंडिया इथे कार्यक्रम
- विजयी मशाल 9 सप्टेंबरपर्यंत मुंबईत असून युद्धातील जवानांच्या घरी नेली जाणार.
भारत-पाक दरम्यानच्या 1971 च्या बांगलादेश निर्मिती युद्धातील विजयाला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, भारत ‘स्वर्णिम विजय वर्ष’ साजरे करत आहे. भारताच्या या विजयाचे प्रतीक म्हणून 16 डिसेंबर 2020 रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, नवी दिल्लीत विजयी मशाल प्रज्वलित करण्यात आली. ही विजयी मशाल देशाच्या चार मुख्य दिशांना प्रवास करते आहे.

पश्चिम क्षेत्रातील विजयी मशाल, म्हणजेच स्वर्णिम विजय मशाल आज मुंबईत पोहोचली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गेट वे ऑफ इंडिया इथे या मशालीचे स्वागत करण्यात आले. यानिमित्त गेट वे ऑफ इंडिया इथे, महाराष्ट्र,गुजरात आणि गोवा क्षेत्रातील मुख्यालयांच्या मार्गदर्शनाखाली एक भव्य स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. लष्करी क्षेत्रातील मान्यवर तसेच इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते, 1971 च्या युद्धात शौर्यचक्र मिळवलेल्या सैनिकांचा सत्कार करण्यात आला. भारतीय हवाई दलाच्या विमानांनी यावेळी हवाई मानवंदना दिली. तसेच तिन्ही दलांच्या संयुक्त बँडपथकाचा गेट वे ऑफ इंडिया इथे कार्यक्रमही झाला.

ही विजयी मशाल 9 सप्टेंबर पर्यंत मुंबईत राहणार असून, त्यानंतर ती पणजीसाठी रवाना होणार आहे. या काळात, भारतीय सैन्यदलांतर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. तसेच, ही विजयी मशाल, महाराष्ट्र,गुजरात आणि गोवा मुख्यालयाच्या प्रतिनिधींसह, 1971 च्या युद्धात पराक्रम गाजवणाऱ्या आणि बलिदान देणाऱ्या सैनिकांच्या घरी नेली जाणार आहे.

* * *
M.Chopade/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1751230)