सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

नितीन गडकरी यांनी आउटलुक बिझनेस लीडिंग एज 2021-"रिगेनिंग ग्रोथ"ला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले

Posted On: 12 MAR 2021 7:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 मार्च 2021


रस्ते वाहतूक आणि महामार्ग आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री  नितीन गडकरी यांनी आज   आउटलुक बिझनेस लीडिंग एज 2021 -" रिगेनिंग ग्रोथ " ला  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले.  कोरोना काळानंतर भारत कसा आर्थिक प्रगतीच्या मार्गावर पुन्हा वाटचाल करत  आहे याविषयी आपले विचार सांगताना गडकरी म्हणाले की, “एमएसएमई क्षेत्रासाठी सरकारने तीन लाख कोटी रुपयांचे पॅकेज याआधीच जाहीर केले आहे आणि बाजारात तरलता वाढवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.” भांडवल  बाजारातून भांडवल उभे करण्यासाठी आम्ही बँक उलाढाल, जीएसटी, आयकर आणि ताळेबंदाच्या आधारे मागील पाच वर्षांत उत्तम कामगिरीची नोंद असलेल्या एमएसएमईला प्रोत्साहन देत  आहोत” असे ते म्हणाले. गडकरी म्हणाले की, आम्ही इथेनॉल-अर्थव्यवस्था सध्याच्या 20,000  कोटी रुपयांवरून दोन लाख कोटी रुपयांवर नेण्याचा प्रयत्न करत आहोत. ते म्हणाले की सरकार पायाभूत सुविधांवरील खर्च वाढवत आहे. जलमार्ग, जलवाहतूक, समुद्री वाहतुकीच्या विकासाचे महत्त्व अधोरेखित करताना  गडकरी म्हणाले की, “जलमार्ग विकसित करून आम्ही वाहतूक खर्च कमी करणार आहोत. ” ते  म्हणाले की, “वाहतूक व्यवस्थेला इलेक्ट्रिक ट्रक, इलेक्ट्रिक सार्वजनिक वेगवान वाहतूक   यासारख्या विजेवर चालणाऱ्या वाहतुकीमध्ये रूपांतरित करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. ग्रामीण अर्थव्यवस्थेवर भर देताना गडकरी म्हणाले की, “आपण ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याची गरज आहे आणि बाजारात तरलता वाढवून आम्ही  अधिकाधिक रोजगाराची क्षमता निर्माण करत आहोत. देशाची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत असल्याचा उल्लेख करताना गडकरी म्हणाले की, “गेल्या दोन महिन्यांपासून विकास दर सकारात्मक दिशेने जात आहे आणि सहा महिन्यांत ही परिस्थिती चांगली असेल.” गडकरी म्हणाले की, “अर्थसंकल्पात रस्ते वाहतुकीला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून अर्थसंकल्पात रस्ते व वाहतुकीसाठी 1,18,000 कोटी रुपये मंजूर झाले आहेत.” ते  म्हणाले की, “सध्या रस्ते बांधण्याची गती प्रतिदिन  34 किलोमीटर आहे आणि आम्ही  भारताला जगातील दुसर्‍या क्रमांकाचे रस्ते जाळे असलेला देश  बनवत आहेत.” ते म्हणाले, “आमचे प्राधान्य 115 महत्वाकांक्षी जिल्हे आणि ग्रामीण, कृषी व आदिवासी अर्थव्यवस्था आहे आणि सरकार या अनुषंगाने काम करत आहे”.

गडकरी म्हणाले की, “बाजारातील तरलता वाढवण्यासाठी सरकार भांडवलासह मदत करत  आहे आणि आता आम्ही पायाभूत सुविधांवर आपला खर्च वाढवत आहोत आणि यामुळे रोजगाराची क्षमता निर्माण करण्याबरोबरच बाजारात तरलता निर्माण होईल”. ते  म्हणाले, “इंधन म्हणून इथेनॉल, मेथेनॉल, बायो-डिझेल, बायो-सीएनजी, इलेक्ट्रिक आणि हायड्रोजन इंधन विक्रीला  स्वीकारून आणि घोषित केलेल्या स्क्रॅपिंग पॉलिसीनुसार आम्ही वाहन उद्योगाला पाच वर्षात 4,50,000 कोटी वरून 10 लाख कोटी रुपयांवर नेणार आहोत."


* * *

M.Chopade/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1704432) Visitor Counter : 212


Read this release in: English , Urdu , Hindi