वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

भारत-बांगलादेश व्यापार मंचाची नवी दिल्लीत बैठक

Posted On: 04 OCT 2019 2:30PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 4 ऑक्टोबर 2019

 

भारत आणि बांगलादेश हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी नसून दोन्ही देशांना समृद्ध बनवण्याच्या क्षेत्रात एकमेकांचे सहकारी आहेत असे केंद्रीय वाणिज्य, उद्योग आणि रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी सांगितले. ते आज नवी दिल्लीत भारत-बांगलादेश व्यापार मंचाच्या बैठकीत बोलत होते. भारत दौऱ्यावर आलेल्या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यावेळी उपस्थित होत्या.

भारतीय उद्योग क्षेत्रांनी बांगलादेशमध्ये विविध क्षेत्रात गुंतवणूक करून बांगलादेशच्या विकासातील भागीदार व्हावे असे गोयल यांनी सांगितले.

रेल्वे क्षेत्राबाबत बांगलादेशच्या प्रत्येक विनंतीप्रती कटिबद्ध असल्याचे गोयल म्हणाले. बांगलादेशमधल्या रेल्वेच्या जाळ्याचा विस्तार केल्याने दोन्ही देशातील व्यापाराला चालना मिळेल तसेच भारताच्या ईशान्येकडील भागाशी सुरळीतपणे संपर्क साधता येईल, असेही गोयल म्हणाले.

बांगलादेश सरकार आणि तिथल्या व्यापार क्षेत्राला भारतीय व्यापार क्षेत्रातील प्रमुखांशी चर्चा करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी भारत सरकार तसेच उद्योग आणि व्यापार मंत्रालयाचे आभार मानले. भारतीय गुंतवणूकदारांसाठी बांगलादेशमध्ये तीन विशेष आर्थिक क्षेत्र स्थापन करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

याप्रसंगी दोन्ही सरकारं आणि व्यापार क्षेत्रामध्ये सामंजस्य करार करण्यात आले. यामध्ये बांगलादेश आणि टेक महिंद्र तसेच बांगलादेश आर्थिक क्षेत्र प्राधिकरण आणि अदानी बंदरं आणि विशेष आर्थिक क्षेत्र कंपन्यांचा सहभाग आहे.

 

B.Gokhale/J.Patankar/P.Kor



(Release ID: 1587188) Visitor Counter : 69


Read this release in: English