भारतीय निवडणूक आयोग

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगातर्फे पत्रकार परिषद

Posted On: 18 SEP 2019 9:08PM by PIB Mumbai

 

मुंबई, 18 सप्टेंबर 2019

 

येत्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगातर्फे आज सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी पत्रकारांना माहिती देतांना सांगितले की, अलिकडे विधानसभा निवडणुकांच्या तयारीची पाहणी करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या एका चमुने महाराष्ट्राला भेट दिली. या निवडणुका विशेषत: नक्षलवादी भागात मुक्त वातावरणात होण्यासाठी पोलीस आयुक्त, क्षेत्रीय यंत्रणा, नियंत्रक अधिनियामक संस्था, आयकर, राज्य सीमा शुल्क, रेल्वे, पोलीस महासंचालकांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बनावट मतदार ओळखपत्रांचा वापर रोखण्यासाठी विशेष काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यातल्या 125 विधानसभा मतदार संघांमधील 1500 ठिकाणी फिरते प्रवासी प्रदर्शन वाहने आणि पथनाट्यांच्या माध्यमांतून मतदारांना प्रशिक्षण आणि जनजागृती करण्यात येणार आहे.

2019 च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत देशाच्या 67 टक्क्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची मतदानाची टक्केवारी 61 टक्के होती. हे सकारात्मक परिणाम लक्षात घेऊन आम्ही यावेळेला मतदार ओळखपत्रांचे लवकर वाटप करणार आहोत. तसेच निवडणुकांच्या वेळेला कुठलाही अपप्रकार न होण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तरतूद करण्यात येणार आहे, असे मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले.

वृद्ध आणि दिव्यांगांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी 5 हजार 300 मतदान केंद्र तिसऱ्या मजल्यावरून तळमजल्यावर हलवण्यात आले आहेत. 18 ते 35 वयोगटाच्या मतदारांचा मतदानातील सहभाग वाढवण्यासाठी मतदार जागरुकता कार्यक्रमाचे आयोजन निवडणूक आयोगातर्फे करण्यात आले आहे.

निवडणूक खर्चाविषयी बोलतांना अरोरा म्हणाले की, अनेक राजकीय पक्षांनी खर्च मर्यादेमध्ये वाढ करण्याची मागणी केली आहे तर अनेक पक्षांनी ही मर्यादा कमी करावी असे सांगितले. तसेच हा खर्च वैयक्तिक न लावता पक्षाचा खर्च म्हणून धरण्यात यावा, अशीही मागणी आमच्याकडे आलेली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त पुढे म्हणाले की, लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या काळातील अनुचित घटनांच्या पार्श्वभूमीवर यावेळेला विशेष सुरक्षा व्यवस्था करावी, असे त्यांनी पोलीस विभागाला सांगितले आहे. समाजविरोधी कारवाया करणाऱ्या समाजकंटकांना पकडणे आणि त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी केंद्रीय पोलीस सशस्त्र दलाला आदेश देण्यात आले आहेत.

निवडणूक आयुक्तांनी ईव्हीएम मशीन, व्हीव्हीपॅट संदर्भात निवडणूक कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देण्यावर जोर दिला. तसेच सार्वत्रिक निवडणुकांच्या कालावधीतील प्रलंबित न्यायिक प्रकरणे निकालात काढावीत, असेही सांगितले.

निवडणुकांच्या तारखांसंदर्भात विचारले असता मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की, विविध धर्मांचे उत्सव, उपलब्ध मनुष्यबळ किंवा इतर तत्सम गोष्टींचा विचार करून निवडणुकांच्या तारखा ठरवण्यात येतील. जेणेकरून मतदानाची टक्केवारी वाढेल. यावेळी निवडणूक आयुक्तांनी महाराष्ट्रातील निवडणुकांवर आधारित टपाल तिकिटांचे तसेच विशेष टपाल पाकिटाचे प्रकाशन केले. मतदार जागृती वाहनाला झेंडा दाखवून निवडणूक आयुक्तांनी उद्‌घाटन केले. तसेच त्यांच्या हस्ते ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मोबाईल व्हॅनचेही उद्‌घाटन आणि कॉफी टेबल बुकचेही प्रकाशन केले.

या पत्रकार परिषदेला निवडणूक आयुक्त अशोक लवासा, सुनील चंद्रा यांच्यासह भारतीय निवडणूक आयोगाचे अनेक अधिकारी उपस्थित होते.

 

B.Gokhale/S.Kane/P.Kor

 


(Release ID: 1585527) अभ्यागत कक्ष : 183
Read this releasein: English