Posted On:
04 MAR 2019 6:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 मार्च 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबादला भेट देऊन विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले.
वस्त्राल गाव मेट्रो स्थानकात पंतप्रधानांनी अहमदाबाद मेट्रो सेवेच्या पहिल्या टप्प्याचा प्रारंभ केला. अहमदाबाद मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन पंतप्रधानांनी केले.भारताची स्वदेशात विकसित केलेलीआणि एक राष्ट्र-एक कार्ड यावर आधारित, पहिली पेमेंट इको-सिस्टीम आणि प्रवासी भाडे गोळा करणाऱ्या,ऑटोमेटीक फेअर कलेक्शन यंत्रणेचे त्यांनी उद्घाटन केले.यानंतर पंतप्रधानांनी मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला आणि मेट्रोतून प्रवासही केला.
1200 खाटांच्या नव्या नागरी रुग्णालयाचे,नव्या कर्करोग रुग्णालयाचे,दंत रुग्णालयाचेआणि नेत्र रुग्णालयाचे त्यांनी अहमदाबाद इथे उद्घाटन केले. दाहोद रेल्वे कारखाना आणि पाटण-बिंदी रेल्वे मार्गाचे पंतप्रधानांनी लोकार्पण केले आणि लोथल सागरी संग्रहालयाचे भूमिपूजन केले.
बीजे वैद्यकीय महाविद्यालय मैदानातल्या जाहीर सभेत बोलतांना, अहमदाबाद मेट्रोचे स्वप्न साकार झाल्याने हा ऐतिहासिक दिवस असल्याचे सांगितले.मेट्रोमुळे अहमदाबादमधल्या जनतेला सोयीचे,पर्यावरण स्नेही वाहतुकीचे साधन उपलब्ध झाल्याचे ते म्हणाले.2014 पूर्वी,देशात मेट्रोचे केवळ 250 किमी कार्यान्वित जाळे उपलब्ध होते आता ते 655 किमी झाल्याचे त्यांनी सांगितले.
आज सुरु करण्यात आलेल्या कॉमन मोबिलिटी कार्डमुळे,देशभरात मेट्रो आणि इतर वाहतुकीची साधने वापरताना विविध कार्ड बाळगण्याची आवश्यकता राहणार नाही. या कार्डमुळे प्रवासासाठी एक राष्ट्र-एक कार्ड अस्तित्वात येईल.स्वदेशात निर्मिती करण्यात आलेल्या या कार्ड मुळे,अशी कार्ड तयार करण्यासाठीचे आधीचे आंतरराष्ट्रीय अवलंबित्व नाहीसे झाले आहे.वाहतुकीसाठी,एक राष्ट्र-एक कार्डअसणाऱ्या मोजक्या देशांपैकी भारत एक देश ठरल्याची माहिती त्यांनी दिली.
केंद्र आणि राज्य सरकारच्या, पाणी पुरवठा योजना,सर्वांसाठी वीज,पायाभूत विकास,सर्वांसाठी निवारा,गरिबांसाठीच्या योजना यासारख्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.राज्यातल्या आदिवासी कल्याणासाठी हाती घेण्यात आलेल्या विविध योजनांची त्यांनी तपशीलवार माहिती दिली.
सूक्ष्म, तपशीलवार नियोजन आणि राज्यातल्या जनतेची कठोर मेहनत यामुळे गेल्या दोन दशकात गुजरातचा कायापालट झाला आहे. विकास कसा हाती घ्यावा यासाठी अभ्यास करण्यासाठी गुजरातचे उदाहरण अभ्यासावे असे ते म्हणाले.गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आलेल्या पायाभूत विकास प्रकल्पांच्या अंमलबजावणीमुळे राज्याचा मोठ्या प्रमाणात कायापालट होईल.
लोथल सागरी वारसा संकुल पूर्ण झाल्यानंतर प्राचीन भारताच्या सागरी सामर्थ्याचे दर्शन घडेल.यामधल्या संग्रहालयात जागतिक दर्जाच्या सुविधा राहणार असून यामुळे राज्यातल्या पर्यटन क्षमतेत वाढ होणार आहे असे पंतप्रधान म्हणाले.
आरोग्याला केंद्र सरकारचे प्राधान्य असून,वेलनेस सेंटर ते वैद्यकीय महाविद्यालयापर्यंत,सरकार, देशभरात दर्जेदार आरोग्य पायाभूत संरचना निर्माण करत आहे.गुजरातमध्ये उभारण्यात येत असलेल्या जागतिक दर्जाच्या सुविधांचा त्यांनी उल्लेख केला.
भ्रष्टाचारापासून ते दहशतवादापर्यंत देशातल्या सर्व धोक्याविरोधात लढा देण्यासाठी आपले सरकार कटीबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.देशविरोधी काम करणाऱ्या तत्वाविरोधात कडक कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.देशाच्या सुरक्षितते संदर्भात मतांचे राजकारण करू नये असे आवाहन त्यांनी विरोधकांना केले.अशा कृत्यांमुळे सैन्य दलाच्या मनोधैर्यावर परिणाम होईल आणि शत्रू बळकट होईल असे पंतप्रधान म्हणाले.
B.Gokhale/N.Chitale/P.Kor