पंतप्रधान कार्यालय

अमेठी इथल्या इंडो-रशियन रायफल संयुक्त प्रकल्पाचे  पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रार्पण

Posted On: 03 MAR 2019 6:11PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 3 मार्च 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातल्या अमेठी मधल्या कौहारला भेट दिली. कलाश्निकोव्ह असॉल्ट  रायफल निर्मितीसाठीच्या रशिया-भारत संयुक्त प्रकल्पाचे त्यांनी राष्ट्रार्पण केले.

अमेठी इथे त्यांनी विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणीही केली. या प्रसंगी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांचा विशेष संदेश संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी वाचून दाखवला. नवा संयुक्त प्रकल्प जग प्रसिध्द नव्या 200 श्रेणीतल्या कलाश्निकोव्ह असॉल्ट  रायफलची निर्मिती करणार असून अखेरीला हे उत्पादन संपूर्णतः स्थानिक होणार आहे.भारतीय संरक्षण-उद्योग क्षेत्राला,राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीच्या, लहान शस्त्रे  क्षेत्रातल्या गरजा ,रशियाच्या अद्ययावत तंत्रज्ञानाच्या आधारे पूर्ण करता येणार आहेत, असे या संदेशात म्हटले आहे.

या भागीदारीसाठी, पंतप्रधानांनी, राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचे आभार मानले.अमेठीतल्या या कारखान्यातून लाखो रायफलची निर्मिती होईल आणि आमची सुरक्षा दले यामुळे अधिक  मजबूत होतील असे पंतप्रधानांनी यावेळी बोलताना सांगितले.

 आपल्या जवानांसाठीच्या, आधुनिक रायफलच्या उत्पादनाला विलंब झाल्यामुळे जवानांसाठी हा अन्याय झाला. बुलेटप्रुफ जाकीटसाठी 2009 मधेच आवश्यकता सादर केल्यानंतरही 2014 पर्यंत अशी जाकिटे खरेदी करण्यात आली नव्हती.केंद्र सरकारने आता ही गरज पूर्ण केली आहे असे त्यांनी सांगितले. याआधी, इतर महत्वाच्या शस्त्रास्त्राच्या खरेदीतही असा विलंब होत असे. या संदर्भात त्यांनी राफेल लढाऊ विमानांचा उल्लेख करत,केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे ही विमाने येत्या काही महिन्यात हवाई दलात दाखल होऊ लागतील असे त्यांनी सांगितले.

विकास प्रकल्प कार्यान्वित होण्यात विविध अडथळे आलेल्या, अमेठीतल्या इतर विकास प्रकल्पांचा त्यांनी उल्लेख केला.हे अडथळे आता दूर करण्यात आले आहेत,त्यामुळे हे प्रकल्प आता कार्यान्वित होऊ शकतील  आणि जनतेला रोजगार पुरवतील असे पंतप्रधान म्हणाले. अमेठीत, पंतप्रधान आवास योजना,उज्वला योजना,सौभाग्य योजना यासारख्या योजनांचीअंमलबजावणी, स्वच्छतागृहांची बांधणी यामुळे जनतेचे जीवन सुकर होत असल्याचे ते म्हणाले.

केंद्र सरकार,गरिबांचे सक्षमीकरण करत असून त्यांना दारिद्र्यातून बाहेर येण्यासाठी मदत करत आहे.त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचेही  सक्षमीकरण करण्यात येत आहे.यासंदर्भात त्यांनी किसान सन्मान निधीचा उल्लेख केला.या योजने अंतर्गत येत्या दहा  वर्षात शेतकऱ्यांपर्यंत 7.5 लाख कोटी रुपये पोहोचणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 

 

B.Gokhale/N.Chitale/P.Kor

 



(Release ID: 1567488) Visitor Counter : 79


Read this release in: English