पंतप्रधान कार्यालय

16 व्या लोकसभेच्या अखेरच्या बैठकीतील पंतप्रधानांचे संबोधन

प्रविष्टि तिथि: 13 FEB 2019 9:04PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 16 व्या लोकसभेच्या शेवटच्या बैठकीला संबोधित केले.

सदनाच्या कार्यवाही संदर्भात लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या तटस्थ भूमिकेचे त्यांनी कौतुक केले. पंतप्रधानांनी 16 व्या लोकसभेच्या कार्यकाळातील संसदीय व्यवहार मंत्र्यांच्या भूमिकेचेही कौतुक केले. माजी संसदीय व्यवहार मंत्री दिवंगत अनंत कुमार यांच्या योगदानाचाही त्यांनी उल्लेख केला.

जवळजवळ 3 दशकांनंतर देशात पूर्ण बहुमत असलेले सरकार आल्याचे ते म्हणाले. लोकसभेच्या कामकाजाबद्दल बोलतांना 17 सत्रांपैकी 8 सत्रात 100 टक्के कार्य झाल्याचे सांगून पंतप्रधान म्हणाले की, एकंदरीत कामकाज 85 टक्के झाले आहे.

या लोकसभेच्या कार्यकाळात सत्ताधारी पक्षातील तसेच विरोधी पक्षातील प्रत्येक सदस्यांनी जनतेच्या कार्यासाठी योगदान दिल्याबद्दल पंतप्रधानांनी कौतुक केले.

सर्वाधिक महिला खासदार असल्यामुळे ही लोकसभा स्मरणात राहील, असे सांगतानाच यापैकी 44 खासदार पहिल्यांदाच खासदार झाल्या होत्या, असे पंतप्रधान म्हणाले. महिला खासदारांच्या सहभागाचे कौतुक करताना पंतप्रधान म्हणाले की, पहिल्यांदाच मंत्रिमंडळात सर्वाधिक महिला मंत्री असून मंत्रिमंडळ सुरक्षा समितीत दोन महिला मंत्री सदस्य आहेत.

‘देशाचा आत्मविश्वास सर्वाधिक उंचीवर असून ही सकारात्मक गोष्ट आहे, कारण अशा आत्‍मविश्वासामुळेच विकासाला चालना मिळते’ असे पंतप्रधान म्हणाले.

भारत जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था असून, पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

ऊर्जा, डिजिटल तंत्रज्ञान, अंतरिक्ष, उत्पादन आदी क्षेत्रातील भारताच्या सफलतेचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले की, जग सध्या जागतिक हवामान बदलाबद्दल बोलत आहे आणि याचे शमन करण्यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय सौर आघाडी स्थापन करण्यासाठी प्रयत्न केला आहे.

पूर्ण बहुमत असलेल्या सरकारची ओळख पटल्याने संपूर्ण जग आपल्याला गांभीर्याने घेत आहे आणि याचे श्रेय 2014 मध्ये नागरिकांनी दिलेल्या जनादेशाला आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

भारताच्या परराष्ट्र धोरणाबद्दल बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, नेपाळमधील भूकंप, मालदीवमधील पाण्याची समस्या किंवा येमेनमधून नागरिकांची सुटका असो या सर्वांमधील मदत कार्यात भारताने मानवतावादी भूमिका बजावली आहे. योगाला आज जागतिक स्तरावर मान्यता मिळाली असून अनेक देश आता बाबासाहेब आंबेडकर आणि गांधी जयंती साजरी करत आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले.

लोकसभेत झालेल्या कार्याचा लेखाजोखा मांडताना 219 विधेयके मांडण्यात आली, यापैकी 203 विधेयके संमत झाल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरोधातील सरकारच्या भूमिकेचा पुनरूच्चार करतांना पंतप्रधान म्हणाले की, या लोकसभेने नादारी आणि दिवाळखोरी, तसेच फरार आर्थिक गुन्हेगार कायदा यासारखे कडक कायदे संमत केले.

याच लोकसभेने वस्तू सेवा कर कायदा संमत केला असून, या प्रक्रियेत सहकार्याची भावना दिसून आली, असे पंतप्रधान म्हणाले.

आधार, आर्थिकदृष्ट्या दुर्बलांसाठी 10 टक्के आरक्षण, प्रसुतीसाठी फायदे यांसारख्या सरकारच्या पुढाकाराचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला. 16 व्या लोकसभेत कालबाह्य झालेले 1400 हून अधिक कायदे रद्द करण्यात आल्याचेही ते म्हणाले.

16 व्या लोकसभेच्या कार्यकाळात सदनाच्या कार्यवाहीतील योगदान आणि पाठिंब्याबद्दल प्रत्येक सदस्यांचे आभार मानत पंतप्रधानांनी आपले भाषण संपवले.

 

B.Gokhale/J.Patankar/P.Kor


(रिलीज़ आईडी: 1564559) आगंतुक पटल : 98
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English