पंतप्रधान कार्यालय

राष्ट्रीय महामार्ग 66 वरच्या कोल्लम बायपास उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन

Posted On: 15 JAN 2019 10:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 जानेवारी 2019

 

केरळच्या बंधू-भगिनीनो,

या देव भूमीला भेट देताना मला अतिशय आनंद होत आहे. कोल्लममधे अष्टमुडी सरोवराच्या  काठावर, गेल्या वर्षी झालेल्या महापुरातून जीवन सावरत असल्याची जाणीव मला होत आहे.मात्र पुरानंतर  केरळची पुनर्बांधणी करण्यासाठी आपणा सर्वाना अधिक परिश्रम घ्यावे लागणार आहेत.

जनतेचे जीवन अधिक सुकर करणाऱ्या या बाह्य वळण रस्त्याचे काम पूर्ण केल्याबद्दल मी आपणा सर्वांचे अभिनंदन करतो. जनतेचे जीवन सुलभ आणि अधिक सुकर करण्यासाठी माझे सरकार कटीबद्ध आहे. ‘सबका साथ,सबका विकास’ हे आमचे ब्रीद आहे.याच कटीबद्ध्तेने माझ्या सरकारने जानेवारी 2015 मधे या प्रकल्पाला अंतिम मंजुरी दिली.राज्य सरकारचे योगदान आणि सहयोगाने हा प्रकल्प आम्ही  प्रभावी पद्धतीने पूर्ण करू शकलो याचा मला आनंद आहे. 2014 च्या मे महिन्यात सत्तेवर आल्यापासून केरळ मधे पायाभूत विकासाला आम्ही सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.भारतमाला प्रकल्पाअंतर्गत,मुंबई कन्याकुमारी कॉरिडॉरसाठी तपशीलवार अहवाल तयार करण्यात येत आहे. अशा प्रकारच्या विकासाचे अनेक प्रकल्प वेगवेगळ्या टप्प्यावर आहेत.   

आपल्या देशात,पायाभूत प्रकल्पांची घोषणा झाल्यावर अनेक कारणांनी ते ठप्प झाल्याचे आपल्याला अनेकदा दिसून येते. यामुळे,जनतेचा पैसा आणि वेळ यांचा अपव्यय होतो. जनतेचा पैसा असा वाया जाऊ देण्याची ही पद्धत थांबवण्याचा आम्ही निश्चय केला. प्रगतीच्यामाध्यमातून प्रकल्पांना गती देत आम्ही या समस्येवर मात करत आहोत.  

दर महिन्याच्या शेवटच्या बुधवारी सचिव आणि राज्य सरकारांचे मुख्य सचिव यांच्या समवेत बैठक घेऊन  रेंगाळणाऱ्या प्रकल्पांचा  मी आढावा घेतो.

काही प्रकल्प तर 20 ते 30 वर्षे रेंगाळले आहेत हे बघुन मला आश्चर्य वाटते. इतक्या प्रदीर्घ काळ प्रकल्प किंवा योजनेच्या लाभापासून लोकांना वंचित ठेवणे हा गुन्हाच आहे. प्रगती अंतर्गत आतापर्यंत मी सुमारे 12 लाख कोटी रुपयांच्या, 250 पेक्षा जास्त प्रकल्पांचा आढावा घेतला आहे.  

मित्रहो, अटलजींनी, कनेक्टीव्हिटी अर्थात दळणवळणाचे  महत्व जाणले होते त्यांचा हा दृष्टीकोन जपत आम्ही पुढे  नेत आहोत. राष्ट्रीय महामार्ग ते ग्रामीण रस्त्यापर्यंत,आधीच्या सरकारच्या तुलनेत, बांधकामाची गती आता जवळजवळ दुप्पट झाली आहे. 

2014 आधी ग्रामीण भागातल्या 56 टक्के रस्त्यांद्वारे जोडलेल्या रहिवाशांच्या तुलनेत आमच्या सरकार स्थापनेनंतरच्या चार वर्षात 90 टक्के पेक्षा जास्त रहिवासी रस्त्यांद्वारे जोडले गेले आहेत. लवकरच आम्ही 100 टक्के उद्दिष्ट निश्चितच साध्य करू याची मला खात्री आहे.  

रस्त्याप्रमाणेच माझ्या सरकारने, रेल्वे, जलमार्ग आणि हवाई मार्गालाही प्राधान्य दिले आहे.वाराणसी ते  हल्दीया या राष्ट्रीय महामार्गाचे काम याआधीच सुरु करण्यात आले आहे.यामुळे वाहतुकीचा स्वच्छ पर्याय उपलब्ध होऊन  भावी पिढ्यांसाठी पर्यावरणाचे जतन होणार आहे.गेल्या चार वर्षात प्रादेशिक हवाई दळणवळणही  मोठ्या प्रमाणात उंचावले आहे. या सर्वांमुळे रोजगार निर्मितीही वाढत आहे.

आपण जेव्हा रस्ते आणि पूल बांधतो, तेव्हा आपण केवळ शहरे आणि गावांना जोडत नाही तर आकांक्षाची  कामगिरीशी, आशावादाची संधींशी आपण सांगड घालत असतो.

प्रत्येक देशवासियाच्या विकासासाठी माझी कटीबद्धता आहे. रांगेतल्या शेवटच्या माणसाला माझे प्राधान्य आहे.मत्स्य क्षेत्रासाठी माझ्या सरकारने 7500  कोटी रुपयांचा नवा निधी मंजूर केला आहे.

आयुष्मान योजने अंतर्गत गरीब कुटुंबाला 5 लाखापर्यंत रोकड रहित आरोग्य सुविधेची  हमी दिली जात आहे.आतापर्यंत 8 लाखापेक्षा जास्त रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.सरकारने आतापर्यंत 1,100 कोटी पेक्षा जास्त निधी मंजूर केला आहे. या योजनेच्या अंमलबजावणीला गती द्यावीअसे आवाहन मी  केरळ सरकारला करतो, ज्यामुळे केरळ ची जनता याचा लाभ घेऊ शकेल.

पर्यटन म्हणजे केरळच्या आर्थिक विकासाचा महत्वाचा पैलू आणि राज्याच्या अर्थ व्यवस्थेत महत्वाचे योगदान देणारा घटक. पर्यटन क्षेत्रात माझ्या सरकारने मोठे परिश्रम घेतले आणि त्याचे परिणामही उत्तम आहेत.जागतिक प्रवास आणि पर्यटन परिषदेच्या 2018 च्या नव्या  सामर्थ्यवान मानांकनात भारत तिसऱ्या स्थानावर स्थानापन्न आहे.ही महत्वाची बाब असून यामुळे  देशाच्या संपूर्ण पर्यटन क्षेत्राला नवी झळाळी मिळणार आहे.

वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या प्रवास आणि पर्यटन स्पर्धात्मकता सूची मधे भारताने 65 व्या स्थानावरून 40 व्या स्थानावर झेप घेतली आहे. भारतात येणाऱ्या पर्यटकांची संख्या 2013 मधल्या 70 लाखावरून 2017 मधे ही संख्या 1 कोटी पर्यंत गेली आहे. 42 टक्के वाढ. पर्यटनातून प्राप्त होणारे परकीय चलन 2013 मधल्या 18 अब्ज डॉलर्सवरून, 2017 मधे 27 अब्ज डॉलर्स वर पोहोचले आहे. 50 टक्के ने झेप. 2017 मधे भारत, पर्यटन स्थान म्हणून  झपाट्याने वाढणाऱ्या स्थानापैकी एक होता. 2016 मधे,भारताची या क्षेत्रात 14 टक्के वाढ होती, त्याच वेळी जागतिक स्तरावर ही वाढ साधारणतः 7 टक्के होती.

भारतीय पर्यटन विश्वाचे चित्र पालटण्यात, ई विझाची सुरवात ही मोठी बाब ठरली.जगभरातल्या 166 देशातल्या नागरिकांना ही सुविधा आता उपलब्ध आहे.

पर्यटन,वारसा आणि धार्मिक स्थळी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी माझ्या सरकारने,दोन कार्यक्रम हाती घेतले स्वदेश दर्शन: संकल्पनेवर आधारित पर्यटन परिक्रमेचा एकीकृत विकास आणि प्रसाद’.

केरळची पर्यटन क्षमता लक्षात घेऊन स्वदेश दर्शन आणि प्रसाद योजने अंतर्गत आम्ही केरळसाठी,सुमारे 550 कोटी रुपयांचे प्रकल्प मंजूर केले आहेत.

 अशा एका प्रकल्पाचे मी यानंतर थिरूवनंतपुरम मधल्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात   उद्‌घाटन करणार आहे. केरळ आणि देशाच्या इतर भागातल्या  जनतेच्या कल्याणासाठी मी भगवान पद्मनाभ स्वामींचे आशीर्वादही घेणार आहे.

कोल्लम कंदालील्लामवेंदाया म्हणीबद्दल मी ऐकले आहे, म्हणजे एकदा तुम्ही कोल्लम मधे आलात की तुम्ही घरापासून दूर आला आहात असे तुम्हाला वाटत नाही माझ्याही अशाच भावना आहेत.

केरळ आणि कोल्लममधल्या  जनतेच्या स्नेहभावासाठी मी त्यांचे आभार मानतो.विकसित आणि बळकट केरळसाठी मी प्रार्थना करतो.

 

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1560514) Visitor Counter : 83


Read this release in: English