पंतप्रधान कार्यालय

दैनिक जागरणच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त जागरण मंचावर पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 07 DEC 2018 6:40PM by PIB Mumbai

 

 

नवी दिल्ली, 7 डिसेंबर 2018

 

येथे उपस्थित सर्व वरिष्ठ मान्यवर, स्त्री आणि पुरुषगण

सर्वप्रथम मी दैनिक जागरणच्या प्रत्येक वाचकाला, वृत्तपत्राच्या प्रकाशनासाठी आणि वृत्तपत्र घराघरापर्यंत पोहचवण्याचे काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे, विशेषतः विक्रेता बंधूंचे, तुमच्या संपादकीय टीमचे अमृत महोत्सवानिमित्त खूप-खूप अभिनंदन करतो , खूप-खूप शुभेच्छा देतो.

गेली 75 वर्षे तुम्ही अव्याहतपणे देशातील कोट्यवधी लोकांना माहिती आणि समस्यांशी जोडलेले आहे. देशाच्या पुनर्बांधणीत दैनिक जागरणने महत्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे. देशाला जागरूक बनवण्यात तुम्ही महत्वपूर्ण भूमिका पार पाडत आला आहात. भारत छोडो चळवळीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही जे कार्य सुरु केले आहे, ते आज नवीन भारताच्या नवीन आशा, नवीन संकल्प आणि नवीन संस्कारांना पुढे घेऊन जाण्यात सहकार्य करत आहे. दैनिक जागरणच्या वाचकांपैकी मी एक आहे. बहुधा तिथूनच सुरुवात होते. माझ्या अनुभवाच्या आधारे मी हे सांगू शकतो की गेल्या दशकांमध्ये दैनिक जागरणने देशात आणि समाजात परिवर्तन घडवून आणण्याच्या मोहिमेला बळ दिले आहे.

गेल्या चार वर्षात तुमचा समूह आणि देशातील तमाम माध्यम संस्थांनी राष्ट्र निर्माणाचा मजबूत स्तंभ या नात्याने आपली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडली आहे. मग ते बेटी बचाओ-बेटी पढ़ाओ अभियान असेल, स्‍वच्‍छ भारत अभियान असेल. या लोकचळवळी बनल्या आहेत. आणि माध्यमांचीही यात सकारात्मक भूमिका राहिली आहे. दैनिक जागरणने देखील यात प्रभावी योगदान देण्यासाठी कायम पुढाकार घेतला आहे. अलिकडेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मला तुमच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली होती. तेव्हा मला सांगण्यात आले होते की, स्वच्छतेसाठी तुम्ही सर्वजण कशाप्रकारे समर्पित वृत्तीने काम करत आहात.

मित्रांनो, समाजात माध्यमांची ही भूमिका आगामी काळात आणखी महत्वपूर्ण ठरणार आहे. आज डिजिटल क्रांतीने माध्यमांना , वृत्तपत्रांना आणखी विस्तारले आहे आणि मला वाटते की नवीन माध्यमे नव्या भारताच्या पायाला अधिक बळ देईल.

मित्रानो, जेव्हा जेव्हा आम्ही  नवीन भारताबाबत बोलतो, तेव्हा किमान शासन, अधिक प्रशासन आणि सबका साथ सबका विकास याच्या मुळाशी , हाच मूलमंत्र घेऊन आम्ही बोलतो. आम्ही अशा एका व्यवस्थेबाबत बोलत आहोत,ज्याद्वारे लोकसहभागातून योजनेची निर्मिती देखील होईल आणि लोकसहभागातून त्यावर अमल देखील होईल. हाच विचार आम्ही गेल्या चार वर्षात पुढे नेला आहे. केंद्र सरकारच्या अनेक योजनाना जनता आपली जबाबदारी समजून पुढे नेत आहे.  सरकार, सरोकार आणि सहकार या भावना देशात मजबूत झाल्या आहेत.

देशातला तरुण आज विकासात स्वतःला भागधारक हितधारक मानू लागला आहे. सरकारी योजनांकडे आपुलकीच्या भावनेतून पाहिले जात आहे. त्याला जाणवतंय की त्याचा आवाज ऐकला जात आहे. आणि याच कारणामुळे सरकार आणि व्यवस्थेवरचा विश्वास आज अभूतपूर्व स्तरावर आहे. हा विश्वास तेव्हा जागा होतो जेव्हा सरकार निर्धारित उद्दिष्टे साध्य करताना दिसून येते. पारदर्शकतेसह काम करताना आढळून येते.

मित्रांनो, जागरण मंचात तुम्ही अनेक विषयांवर चर्चा करणार आहात. अनेक प्रश्न उपस्थित केले जातील, अनेक उत्तरे देखील शोधली जातील. एक प्रश्‍न तुमच्या मंचावर मी देखील विचारणार आहे. आणि प्रश्न माझा असला तरी त्याबरोबर संपूर्ण देशाच्या भावना जोडलेल्या आहेत.तुम्ही देखील बऱ्याचदा विचार करत असाल, विवंचनेत पडले असाल की, आपला देश मागास का राहिला. स्वातंत्र्य मिळून इतकी दशके उलटून गेल्यावरही तुमच्या मनात सतत हे विचार येत असतील की आपण मागे का राहिलो. आपल्याकडे विशाल सुपीक जमीन आहे, आपली तरुण मंडळी अतिशय प्रतिभावान आणि मेहनती आहे, आपल्याकडे नैसर्गिक साधनसंपत्तीची कमतरता नाही,  एवढे सगळे असूनही आपला देश पुढे का जाऊ शकला नाही. काय कारण असेल की छोटे-छोटे देश देखील ज्यांची संख्‍या खूप कमी आहे, ज्यांच्याकडे नैसर्गिक साधनसंपत्ती देखील नसल्यागत आहे, असे देश देखील अतिशय कमी वेळेत आपल्यापुढे निघून गेले.

आपले चांद्रयान चंद्रावर पोहचले ही आपल्या देशवासीयांची क्षमता आहे. आपण खूप कमी खर्चात मंगल मोहिमेसारखा  महायज्ञ पूर्ण केला. मात्र या देशातील कोट्यवधी लोकांच्या गावापर्यंत रस्ते देखील पोहचले नाहीत याचे काय कारण असेल.

मित्रांनो, भारतीयांच्या संशोधनामुळे जग झगमगते आहे. मात्र काय कारण असेल की, कोट्यवधी भारतीयांना वीज देखील मिळत नव्हती. आपल्या देशातील लोक गेल्या सहा दशकांपेक्षा अधिक काळ पायाभूत सुविधांपासून का वंचित राहिले. मोठमोठे लोक सत्तेत आले, मात्र गेली अनेक दशके जे लोक छोट्या-छोटया समस्यांशी झगडत होते, त्यांच्या समस्यांवर तोडगा निघू शकला नाही.

मित्रांनो, लक्ष्याची कमतरता नव्हती, कमतरता होती इच्छेची, पैशांची कमतरता नव्हती,कमतरता होती आवड असण्याची, उपायांची कमतरता नव्हती, संवेदनांची कमतरता होती, सामर्र्थ्याची कमतरता  नव्हती, कार्य संस्कृतीची कमतरता होती. अगदी सहजपणे काही लोक कबीरदासजींच्या त्या ध्येयाची चेष्टा करतात. ते म्हणाले होते, कल करे सो आज कर, आज करे सो अब , मात्र जरा विचार करा , ही भावना आपल्या कार्य संस्‍कृतिमध्ये अनेक दशकांपूर्वी आली असती, तर आज देशाचे चित्र काय असते.  

 

मित्रांनो, अलिकडेच एलिफंटा पर्यंत पाण्याखालून केबल्सद्वारे वीज पोहचवण्याचा एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. माझीही नजर पडली , आशा करतो तुम्हीही पाहिला असेल. कल्‍पना करा, मुंबई पासून थोड्याच अंतरावर वसलेल्या लोकांना कसे वाटत असेल, जेव्हा ते स्वतः अंधारात दिवस-रात्र घालवत मुंबईचा झगमगाट पाहत असतील. त्या अंधारात 70 वर्षे घालवण्याची कल्‍पना करून पहा. आता काही दिवसांपूर्वीच मला एका व्यक्तीने पत्र लिहून आभार मानले, त्याने पत्र यासाठी लिहिले कारण मेघालय प्रथमच रेल्वेशी जोडले गेले होते. तुम्ही कल्पना करू शकता का,की आम्ही सत्तेवर येण्यापूर्वी मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरा भारताच्या रेल्वे नकाशावर नव्हते. विचार करा, कुणी कशा प्रकारे या राज्यातील लोकांच्या जीवनावर प्रभाव पाडला असेल.

मित्रांनो, यापूर्वी देश कुठल्या दिशेने कुठल्या गतीने चालत होता आणि आज कुठल्या दिशेने आणि कुठल्या वेगाने जात आहे. हा माझ्या माध्यमातील मित्रांसाठी अभ्यासाचा आणि मंथनाचा विषय होऊ शकतो.केव्हा करतील ते मला माहित नाही. विचार करा, स्वातंत्र्यानंतरच्या ६७ वर्षांच्या काळात केवळ ३८ टक्के ग्रामीण घरांमध्ये शौचालय बांधण्यात आले आणि कसे .... प्रश्नांची उत्तरे येथे सुरु होतात, कसे, केवळ चार वर्षात 95 टक्के घरांमध्ये , ग्रामीण घरांमध्ये शौचालय उपलब्‍ध करून देण्यात आली. विचार करा ... स्वातंत्र्यानंतरच्या ६७ वर्षांच्या काळात केवळ  55 टक्के वस्त्या, पाडे आणि गावांपर्यंत रस्ते पोहचले होते आणि कसे ... केवळ चार वर्षात ... रस्ते जोडणी वाढवून 90 टक्क्यांपेक्षा अधिक वस्त्या, गावे, पाड्यांपर्यंत पोहचवण्यात आले. विचार करा ... का स्वातंत्र्यानंतरच्या ६७ वर्षांच्या काळात केवळ  55 टक्के घरांमध्ये गॅस जोडणी होती आणि आता कशी केवळ चार वर्षात गॅस जोडणीची व्याप्ती 90 टक्के घरांपर्यंत पोहचली आहे. विचार करा ... स्वातंत्र्यानंतरच्या ६७ वर्षांच्या काळात केवळ 70 टक्के ग्रामीण कुटुंबांपर्यंत विजेची सुविधा पोहचली होती. आणि आता कशी ... गेल्या चार वर्षात 95 टक्के ग्रामीण कुटुंबांपर्यंत वीज पोहचली आहे. मित्रांनो, अशा प्रकारचे प्रश्न विचारता विचारता तासनतास निघून जातील, व्‍यवस्‍थांमध्ये अपूर्णतेपासून संपूर्णतेपर्यंत जातांना आपल्या देशाने गेल्या चार साडेचार वर्षात जी प्रगती केली आहे ती अभूतपूर्व आहे.

मित्रांनो, विचार करा... स्वातंत्र्यानंतरच्या 67 वर्षांच्या काळात केवळ 50 टक्के कुटुंबांकडेच बँक खाती होती. असे कसे झाले,  देशातील बहुतेक प्रत्येक कुटुंब बँकिंग सेवेशी जोडले गेले आहे. विचार करा ... असे का होते की स्वातंत्र्यानंतरच्या 67 वर्षांच्या काळात केवळ चार कोटी नागरिकच प्राप्तिकर विवरणपत्रे भरत होते. सव्वाशे कोटींचा देश ... केवळ चार वर्षातच तीन कोटी नवीन नागरिक प्राप्तिकर जाळ्याशी जोडले गेले आहेत. विचार करा... असे का होते की जोवर जीएसटी लागू नव्हता , आपल्या देशात अप्रत्यक्ष कर प्रणालीद्वारे 66 लाख उद्योजकांची नोंदणी होती. आणि आता जीएसटी लागू झाल्यानंतर 54  लाख नवीन लोकांनी नोंदणी केली.

मित्रांनो, यापूर्वीची सरकारे असे का करू शकली नाहीत आणि आता जे होत आहे ते कसे होत आहे. लोक तेच आहेत , नोकरशाही तीच आहे, संस्था देखील त्याच आहेत , फायली जाण्याचा रस्ता देखील तोच आहे , टेबल, खुर्ची, पेन सगळे काही तेच आहे आणि तरीही  हे परिवर्तन का झाले. या गोष्टीचा  पुरावा आहे की देश बदलू शकतो. आणि मी तुम्हाला हे देखील सांगू इच्छितो की जो काही बदल झाला आहे , जे काही परिवर्तन झाले आहे , गती आली आहे ती तोवर येत नाही जोवर तळागाळाच्या स्तरापर्यंत जाऊन यासाठी प्रयत्न केले जात नाहीत , त्यांची अंमलबजावणी केली जात नाही.

तुम्ही कल्पना करा... जर  देशातील नागरिकांना दशकांपूर्वीच मूलभूत गरजा उपलब्ध करून दिल्या असत्या तर आपला देश कुठून कुठे पोहचला असता. देशातील नागरिकांसाठी हे सगळे करणे माझ्यासाठी सौभाग्याची गोष्ट होती. मात्र हे तेवढंच दुर्भाग्यपूर्ण आहे की, देशाला यासाठी इतकी वर्षे सोसावे लागले.

मित्रांनो, जेव्हा आपल्या देशातील गरीब, शोषित आणि वंचितांना सर्व मूलभूत  सुविधा उपलब्ध होतील... त्यांना शौचालय, बँक खाती, गॅस जोडणी, शिक्षण, आरोग्य यासारख्या गोष्टींपासून मुक्ती मिळेल तेव्हा मग माझ्या देशातील गरीब लोक स्वतःच आपली गरीबी नष्ट करून दाखवतील. हा माझा विश्वास आहे. ते गरीबीतून बाहेर येतील, आणि देशही गरीबीतून बाहेर येईल. गेल्या चार वर्षात तुम्ही हे परिवर्तन घडताना पाहिले आहे. आकडे याची साक्ष देत आहेत, मात्र हे सगळे यापूर्वी झाले नाही. आणि यापूर्वी अशासाठी झाले नाही कारण गरीबी कमी झाली तर गरीबी हटवाचा नारा कसा देता येईल. पूर्वी झाले नाही कारण जर मूलभूत सुविधा सर्वाना मिळाल्या, तर वोट बँकेचे राजकारण कसे होईल. तुष्टीकरण कसे होईल.

बंधू आणि भगिनींनो, आज जेव्हा आम्ही देशातील 100 टक्के लोकांना बहुतांश सर्व मूलभूत सुविधा पुरवण्याच्या जवळ पोहचलो आहोत, तेव्हा भारत दुसऱ्या युगात झेप घेण्यासाठी देखील तयार आहे. आपल्या कोट्यवधी भारतीयांच्या महत्वाकांक्षा , त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी तत्पर आहोत. आज आम्ही नवीन भारताच्या संकल्पापासून सिध्दीपर्यंतच्या प्रवासाच्या दिशेने अग्रेसर आहोत. या प्रवासात ज्या प्रकारे तंत्रज्ञानाचा वापर भारत करत आहे, ते जगातील विकसनशील आणि मागास देशांसाठी देखील एक आदर्श बनत आहे. 

मित्रांनो, आज भारतात कनेक्टिव्हिटी पासून कम्युनिकेशन पर्यंत , कॉम्पिटिशन पासून कन्व्हिनिअन्स आयुष्यातील प्रत्येक पैलूला तंत्राशी जोडण्याचा प्रयत्न होत आहे. तंत्र आणि मानवीय संवेदनांच्या शक्तीने  ease of leaving सुनिश्चित केले जात आहे. आपली व्यवस्था वेगाने नवीन जगाच्या गरजांसाठी तयार होत आहे. सौर ऊर्जा असेल, जैवइंधन असेल, यावर आधुनिक व्यवस्था तयार केल्या जात आहेत.

देशात आज २१ व्या शतकातील आवश्यकता नजरेस ठेऊन पुढल्या पिढीच्या  पायाभूत सुविधा तयार होत आहेत. महामार्ग असेल, रेल्वे असेल, हवाईमार्ग असेल, जलमार्ग असेल, चहूबाजूला काम सुरु आहे. अलिकडेच तुम्ही पाहिले कशा प्रकारे वाराणसी आणि कोलकाता दरम्यान जलमार्गाची नवीन सुविधा कार्यरत झाली आहे. अशाच प्रकारे देशात बनलेली विना इंजिन चालकवाली ट्रेन.. ट्रेन १८ आणि आणि त्याची चाचणी तर तुमच्या वृत्तपत्रातील हेडलाईनमध्ये राहिली आहे. विमान वाहतुकीची स्थिती तर अशी झाली आहे कि आज वातानुकूलित डब्यांमधून जाणार्या यात्रेकरूंपेक्षा अधिक लोक आता विमानातून प्रवास करू लागले आहेत. हे यामुळे घडत आहे कारण सरकार छोट्या छोट्या शहरांना टियर-2 सीटीज, टियर-3 सीटीज यांनाही उडान योजनेशी जोडत आहे. नवीन विमानतळ आणि हवाई मार्ग विकसित करत आहे. व्यवस्थेत चहुबाजूला बदल कसा घडत आहे , ते समजून घेणे अतिशय आवश्यक आहे.

एलपीजी सिलेंडर रिफिलसाठी पूर्वी अनेक दिवस लागायचे , आता केवळ एक दोन दिवसात मिळायला सुरुवात झाली आहे. पूर्वी प्राप्तिकर परतावा मिळायला अनेक महिन्यांचा कालावधी लागायचा. ते देखील आता काही आठवड्यांवर आले आहे. पासपोर्ट बनवायला देखील पूर्वी कित्येक महिने लागायचे, आता तेच काम एक दोन आठवड्यात होते. वीज, पाण्याची जोडणी आता सहज मिळू लागली आहे. सरकारच्या बहुतांश सेवा आता ऑनलाईन आहेत, मोबाईल फोनवर आहेत. यामागची भावना एकच आहे, की सामान्य माणसाला व्यवस्थेशी झगडावे लागू नये, रांगा लागू नयेत, भ्रष्टाचाराच्या शक्यता कमी व्हाव्यात आणि दैनंदिन त्रासातून मुक्ती मिळावी.

मित्रांनो, सरकार केवळ सेवा दारोदारी पोहचवण्यासाठी कटिबद्ध नाही तर योजनांचा लाभ गरजवंतांपर्यंत अवश्य पोहचावा यासाठी देखील गंभीर प्रयत्न करत आहे. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत मिळणारी घरे असतील, उज्‍ज्‍वला योजने अंतर्गत मिळणाऱ्या गॅस जोडण्या असतील, सौभाग्‍य योजनेअंतर्गत विजेची जोडणी असेल, शौचालयाच्या सुविधा असतील. अशा तमाम योजनांच्या लाभार्थ्यांपर्यंत सरकार स्वतः जात आहे, त्यांची ओळख पटवत आहे, त्यांना या सुविधा घेण्यासाठी  प्रोत्‍साहित करत आहे. देशातील 50 कोटींहून अधिक गरीबांच्या आरोग्याला सुरक्षाकवच देणारी प्रधानमंत्री जन-आरोग्‍य योजना PMJAY म्हणजे आयुष्‍मान भारत योजना तर कल्याण आणि समान न्यायाचे उत्तम उदाहरण आहे.

डिजिटल तंत्रज्ञान automation आणि मानवी संवेदनशीलतेच वापर सामान्य जनतेच्या कल्याणासाठी कसा करता येईल. हे आयुष्‍मान भारतमध्ये दिसून येते. या योजनेतील लाभार्थ्यांची आधी ओळख पटवण्यात आली, नंतर त्यांची माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जोडण्यात आली आणि मग गोल्डन कार्डे जारी केली जात आहेत. गोल्‍डन कार्डस् आणि आयुष्‍मान मित्र म्हणजे तंत्रज्ञान आणि मानवी संवेदना यांच्या संगमातून गरीबातील गरीबाला आरोग्याचा लाभ अगदी मोफत मिळत आहे.

मित्रांनो, अजून या योजनेला 100 दिवस देखिल झाले नाहीत, केवळ तीन महिन्यांपेक्षा कमी काळ लोटला आहे आणि आतापर्यंत देशातील साडेचार लाख गरीबानी  याचा लाभ घेतला आहे किंवा रुग्णालयात उपचार घेत आहेत. गर्भवती महिलांच्या शस्त्रक्रियेपासून कर्करोगासारख्या गंभीर आजारांवरचे उपचार आयुष्‍मान भारत मुळे शक्य झाले आहेत.

अशा स्थितीत असलेल्या, या झगमगाटापासून दूर अनेक लोकांचा विचार करा... कि हे लोक कोण आहेत, , हे श्रमिक आहेत, हे कामगार आहेत, शेतकरी आहेत शेत आणि कारखान्यात मजुरी करणारे लोक आहेत, ठेला चालवणारे, रिक्‍शा चालवणारे लोक आहेत. कपडे शिवण्याचे काम करणारे लोक आहेत. कपडे धुऊन उदरनिर्वाह करणारे लोक आहेत. गाव आणि शहरातील असे लोक जे गंभीर आजारांवरचे उपचार केवळ यासाठी टाळत होते कारण त्यांच्यासमोर एक भले मोठे प्रश्नचिन्ह नेहमी असायचे... आपल्या औषधांवर खर्च करायचा की कुटुंबासाठी दोन वेळच्या भाकरीवर खर्च करायचा. आपल्या औषधांवर खर्च करायचा की मुलांच्या अभ्यासावर खर्च करायचा. गरीबांना या प्रश्नाचे उत्तर आयुष्‍मान भारत योजनेच्या रूपाने मिळालेले आहे.

मित्रांनो, गरिबांच्या सशक्तीकरणाचे माध्यम बनवणारे हे काम केवळ इथपर्यंत मर्यदित राहणार नाही. आगामी काळात याचा विस्तार केला जाणार आहे. आमचा प्रयत्न आहे की, अडत्यांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हटवले जावे. उत्‍पादक आणि ग्राहक याना जितके शक्य होईल तेवढे जवळ आणले जाईल. भ्रष्‍टाचार मग तो कुठल्याही स्तरावर असेल,आमचे धोरण स्पष्टही आहे आणि कठोर देखील आहे. या क्षेत्रात केले जाणारे आमचे प्रयत्न जग देखील पाहत आहे. आणि म्हणूनच भारताला संधींचा देश म्हटले जात आहे.

मित्रानो जसे तुम्ही सर्वजण जाणता , काही दिवसांपूर्वी अर्जेंटिना मध्ये जी-20 परिषद झाली, त्या परिषदेत आलेल्या नेत्यांशी मी चर्चा केली. आम्ही आमच्यातले संभाषण देखील जगातील सामर्थ्यवान अर्थव्यवस्थांसमोर मांडले. जे आर्थिक गुन्हे करणारे आहेत, फरार आहेत, त्यांना जगात कुठेही सुरक्षित आसरा मिळू नये यासाठी भारताने काही सूचना आंतरराज्य समुदायाकडे मांडल्या. मला खात्री आहे की आमची ही मोहीम आज ना उद्या कधी ना कधी यशस्वी होईल. 

मित्रांनो, या विश्वासामागचे एक मोठे कारण हे आहे कि आज भारताचे म्हणणे जग ऐकत आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. जगातील अनेक देशांशी आमचे संबंध अतिशय सौहार्दपूर्ण आहेत. त्याचे परिणाम तुम्ही सर्व आणि संपूर्ण देश देखील पाहतही आहे, अनुभव देखील करतो आहे'आताच तीन-चार दिवसांपूर्वी याचे आणखी एक उदाहरण तुम्ही पाहिले आहे, हे सगळे संभव होत आहे आमच्या विश्वासामुळे , आमच्या देशाच्या आत्मविश्वासामुळे,

मित्रांनो,  आज मोठमोठी उद्दिष्ट्ये, कठोर आणि मोठे निर्णय घेण्याचे धाडस सरकार करू शकत आहे कारण त्यामागे एक मजबूत सरकार आहे. पूर्ण बहुमताने निवडून आलेले सरकार आहे. नवीन भारतासाठी सरकारचा भर - सामर्थ्‍य, संसाधन, संस्‍कार, परंपरा, संस्‍कृति आणि सुरक्षा यावर आहे. विकासाची पंच धारा, जी विकासाच्या गंगेला पुढे नेईल.  ही विकासाची पंच धारा- मुलांचे शिक्षण, युवकांना रोजगार, वृद्धांना औषधे, शेतकऱ्यांना सिंचन, जन-जनची सुनावणी. या पाच धारांना केंद्रस्थानी ठेऊन सरकार विकासाची गंगा पुढे नेत आहे.

नवीन भारताची नवीन स्वप्ने साकार करण्यात दैनिक जागरणची, संपूर्ण माध्यम जगताची देखील महत्वपूर्ण भूमिका असणार आहे. व्यवस्थेला प्रश्न विचारणे ही तुमची जबाबदारी आहे आणि तुमचा अधिकार देखील आहे. माध्यमांच्या सूचना आणि तुमच्या टीकेचे तर मी नेहमीच स्वागत करत आलो आहे. आपले स्वातंत्र्य कायम राखत , आपला निष्पक्षपणा कायम राखत दैनिक जागरण समूह राष्ट्र निर्माणाचा पहारेकरी म्हणून अव्याहत कार्य करत राहील. याच आशेसह , याच विश्वासासह मी माझे भाषण संपवतो. तुम्हा सर्वाचे ७५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन आणि उज्वल भविष्यासाठी अनेक-अनेक शुभेच्छा देत मी माझ्या आवाजाला विराम देतो. खूप-खूप धन्यवाद.

 

B.Gokhale/S.Kane/P.Kor



(Release ID: 1555622) Visitor Counter : 120


Read this release in: English