पंतप्रधान कार्यालय

सिक्कीम मधल्या पाक्योंग विमानतळाच्या उद्‌घाटन प्रसंगी पंतप्रधानाचे संबोधन

प्रविष्टि तिथि: 24 SEP 2018 7:07PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  24 सप्टेंबर 2018

 

सिक्कीमचे राज्यपाल गंगाप्रसाद जी, राज्याचे मुख्यमंत्री पवन चामलिंग, केंद्रीय मंत्रीमंडळातले माझे सहकारी सुरेश प्रभू, जितेंद्र सिंह, एस एस अहलुवालिया, राज्य विधानसभेचे अध्यक्ष के. एन .राय, राज्याचे  मंत्री दोरजी शेरिंग लेपच्या, उपस्थित इतर  मान्यवर आणि माझ्या प्रिय बंधू- भगिनीनो,

मित्रहो, गेले तीन दिवस मी हिंदुस्तानच्या पुर्वेकडच्या भागात दौरा करत आहे आणि या दरम्यान पायाभूत क्षेत्र आणि मानव सेवेशी संबंधित अनेक मोठे- मोठे प्रकल्प देशाला समर्पित करण्याची संधी मला लाभली आहे.

झारखंड मधे काल प्रधान मंत्री जन आरोग्य योजना पी.एम.जे..वायची सुरवात आयुष्मान  भारत योजनेचा प्रारंभ केल्यानंतर काल संध्याकाळी मी सिक्कीममधे आलो.आज सकाळी सिक्कीम मधे, सिक्कीमची सकाळ, उगवणारा सूर्य, थंड हवा, डोंगर- दऱ्याचे  नैसर्गिक सौंदर्य, हे सर्व पाहिल्यावर माझाही हात कॅमेऱ्या कडे वळला . इथले नैसर्गिक सौंदर्य, भव्यता कोणाला आवडणार नाही ? प्रत्येकाला ते नक्कीच आवडणार. निसर्गाने आपल्यावर जी उधळण केली आहे ती अनुभवण्यासाठी प्रत्येक जण इथे धाव घेतो.

बंधू-भगिनीनो, आपल्या संस्कृती मधे पूर्व दिशेची  काय महती आहे हे आपण सर्व जाणताच आणि देशही जाणतो.

पुर्वेतही ईशान्य दिशेचे वेगळेच महत्व आहे. पूर्वेकडच्या या सुंदर राज्यात राहणाऱ्या आपणा सर्वाना मी आदरपूर्वक नमन करतो आणि सिक्कीमचा, आपणा सर्वांचा  पहिला पाक्योंग  विमानतळ आपल्याला भेट देतो.

आजचा दिवस सिक्किमसाठी ऐतिहासिक दिवस आहेच  त्याच बरोबर देशासाठीही महत्वाचा आहे. पाक्योंग विमानतळ सुरु होताच आपणा सर्वानाही अभिमान वाटेल. क्रिकेटमधे  खेळाडू शतक झळकवतात, आज हिंदुस्तानने शतक झळकवले आहे. हा विमानतळ सुरु होताच संपूर्ण हिंदुस्तान मधे,100 विमानतळ कार्यरत राहतील, या अर्थाने देशाने आज शतक लावले आहे. देशात कसा बदल होत आहे हे पहा, सिक्कीम फुटबॉलसाठी ओळखले जातेइथे प्रत्येक जण फुटबॉल खेळतो. मात्र याच सिक्कीम मधे आता  क्रिकेटही रुजू लागले आहे.

आज वर्तमानपत्रात मी वाचले की, इथला कर्णधार निलेश लामिछा याने शतक झळकवले आहे.   फुटबॉल प्रेमी सिक्कीम मधे  इथला निलेश शतक लावत क्रिकेट मधे शतक झळकावणारा पहिला  सिक्कीमवासी बनला आहे तर इथला  विमानतळ देशाच्या विमानतळाचे शतक पूर्ण  करत आहे.

बंधू-भगिनीनो, हा विमानतळ आपले जीवन अधिक सुकर करण्यात मोठी भूमिका बजावणार आहे. आतापर्यंत आपणा सर्वाना देशाच्या दुसऱ्या भागातून सिक्कीम मधे यायचे असेल तर किंवा  सिक्कीम मधून दुसऱ्या भागात जायचे असेल तर किती कठीण होते हे इथले लोकही जाणतात आणि इथे येणाराही जाणतो.

आधि पश्चिम बंगालमधल्या बागडोरा पर्यंत विमानाने यायचे त्यानंतर साधारतः सव्वाशे किलोमीटर पर्यंत उंच सखल रस्त्यावरून 5-6 तासाचा थकवणारा प्रवास केल्यानंतर आपण गंगटोकला पोहोचत होतो. मात्र आता पाक्योंग विमानतळ, या थकवणाऱ्या प्रवासाचे अंतर  मिनिटामध्ये आणणार आहे.

बंधू-भगिनीनो,यामुळे प्रवास सुलभआणि कमी तर झाला आहेच त्याचबरोबर सरकारने याकडेही लक्ष दिले आहे कीइथून प्रवास हा सामान्य जनतेच्या आवाक्यात असावा. यासाठी, हा विमानतळ उडान  योजनेशी जोडला गेला आहे. या योजने अंतर्गत2500- 2600 रुपयेच द्यावे लागतात. साधारणतः  अडीच हजार रुपये.

सरकारच्या या दृष्टीकोन आणि प्रयत्नामुळे आज विमानाचा प्रवास, रेल्वेच्या वातानुकुलीत प्रवासा इतका स्वस्त झाला आहे.वेळ हा पैशाप्रमाणे असतो, टाईम इज  मनी  असे आपण ऐकत आलो आहोत. विमानाने प्रवास केल्याने वेळेची बचत होते म्हणजे पैसा वाचतो. या कारणाने आज देशातली लाखो मध्यम वर्गीय कुटुंबे विमानाने प्रवास करण्यासाठीच्या परीस्थितीत आहेत, या प्र्वासासाठी  सक्षम ठरत आहेत.

मित्रहो, आज विमानतळाची सुरवात झाली आहे. आताच मला विमानतळाचे उद्घाटन करण्याची संधी मिळाली आहे. मात्र एक-दोन आठवड्यात इथून गुवाहाटी आणि कोलकात्यासाठी नियमित विमान सेवा सुरु केली जाईल. येत्या काळात देशाच्या दुसऱ्या भागांना आणि शेजारी राष्ट्रांशीही इथून विमान सेवा देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

मित्रहो, पाक्योंग विमानतळ सुंदरतेबरोबरच आपल्या अभियांत्रिकी कौशल्याचेही प्रतिक आहे. सोशल मिडियावर असणाऱ्या लोकांनी गेले तीन दिवस या विमानतळाची छायाचित्रे आणि निसर्गाच्या कुशीत विमान कसे उतरत आहे याची छायाचित्रे पाहिली असतील, ही  छायाचित्रे सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहेत. उद्घाटन तर आज झाले आहे मात्र लोकांनी याचा जयजयकार तर सतत सुरु केला आहे.

साडे पाचशे कोटी खर्चाचा हा विमानतळ आपले अभियंतेकामगार, यांच्या क्षमतेचे दर्शन घडवणारा एक महत्वपूर्ण पैलू आहे. डोंगर तोडून त्याच्यातून दरीत भराव घातला गेला, मुसळधार पावसाचा मुकाबला कसा करण्यात आला. इथून जाणाऱ्या जलधाराना  विमानतळाखालून नेण्यात आले. हा खरेच अभियांत्रिकी क्षेत्रातला चमत्कार आहे.

आज या प्रसंगी,या विमानतळाचा आराखडा ,नियोजन आणि निर्मितीशी संबंधित सर्व अभियंते, सर्व कामगारांचे, या अद्‌भूत कार्यासाठी, मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. आपण सर्वांनी खरेच कमाल केली आहे.

बंधू-भगिनीनो, सिक्कीम आणि ईशान्य भागात पायाभूत आणि भावनिक अशा दोनही बाजूनी संपर्क विस्तार करण्याचे काम वेगानं सुरु आहे. गेल्या चार वर्षात अनेक वेळा ईशान्येकडच्या राज्यात आपणा सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी, इथल्या विकास कामांची माहिती घेण्यासाठी  मी स्वतः आलो आहे.

इतकेच नव्हे तर दर एक दोन आठवड्यात  कोणता ना कोणता केंद्रीय मंत्री ईशान्येकडच्या एखाद्या राज्यात भ्रमण करतो, माहिती घेतो, कामकाजाचा आढावा घेतो. याचा परिणाम काय आहे हे आपण सर्व जण आज इथे पाहत आहात.

सिक्कीम असो, अरुणाचल प्रदेश असो, मेघालय असो, मणिपूर असो, नागालॅंड असो, आसाम असो, त्रिपुरा असो, मिझोरम असो ईशान्येकडच्या सर्व राज्यात अनेक कामे ही स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच होत आहेत. विमान पहिल्यांदाच पोहोचले आहेरेल्वे संपर्क पहिल्यांदाच झाला आहे अनेक  भागात तर  वीजही पहिल्यांदाच पोहोचली आहे

रुंद राष्ट्रीय महामार्ग बनत आहेत, गावात रस्ते निर्माण होत आहेत, नद्यांवर मोठे-मोठे पूल बनत आहेत. डिजिटल इंडियाचा विस्तार होत आहे. सबका साथ-सबका विकास हा मूल मंत्र घेऊन त्यानुसार काम करणारे आमचे सरकार प्रादेशिक असंतुलन दूर करण्यासाठी आणि ईशान्य भारताला देशाच्या विकासाचे इंजिन बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे आणि आम्ही त्यासाठी कटीबद्ध आहोत.

याच दृष्टीकोनातून सिक्कीमला स्वतःचा विमानतळ देण्याच्या कामाला आम्ही गती दिलीअडचणी दूर केल्या आणि आज आपले स्वप्न पूर्ण होत आहे. आपण हे जाणताच की, सहा  दशकापूर्वी इथून एका छोट्या विमानाने उड्डाण केले होते त्यानंतर सहा दशके आपणाला आपल्या विमानतळासाठी प्रतीक्षा करावी लागली.

मित्रहो, सिक्कीमच नव्हे तर अरुणाचल समवेत देशाच्या अनेक राज्यात नवे विमानतळ निर्माण झाले आहेत. मी आधीच सांगितल्याप्रमाणे आज आपले 100 विमानतळ सुरु झाले आहेत. आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल यातले 35 विमानतळ गेल्या चार वर्षात निर्माण आले आहेत

स्वातंत्र्यानंतर 2014 पर्यंत वेगाने काम करणे म्हणजे काय, चहुबाजूने विकास म्हणजे काय, दृष्टीकोन समोर ठेवून काम करणे म्हणजे काय हे या उदाहरणावरून आपल्या लक्षात येईलस्वातंत्र्यानंतर 2014पर्यंत म्हणजे 67 वर्षे , 67 वर्षात 65 विमानतळ निर्मिती, म्हणजे सुमारे एका वर्षात एक विमानतळ. आपल्या लक्षात आले का ? एका वर्षात एक विमान तळ.ही त्यांची गती होती, हा त्यांचा विचार होता.गेल्या चार वर्षामधे, एका वर्षात नऊ विमानतळ उड्डाणासाठी सज्ज आहेत. नऊ पट गती. म्हणजे हे काम पूर्ण करण्यासाठी त्यांना चाळीस वर्षे लागली असती. आम्ही हे काम चार वर्षात करून दाखवले आहे.

बंधू-भगिनीनो, आज देशांतर्गत विमान उड्डाणात भारत, जगातली तिसरी सर्वात मोठी बाजारपेठ बनली आहे. भारतात हवाई सेवा देणाऱ्या कंपन्यांना विमाने कमी पडत आहेत. नव्या विमानासाठी ऑर्डर नोंदवली जात आहे.आपल्याला आणखी एक आकडेवारी सादर करतो.त्यामुळे आपल्याला आश्चर्य वाटेल.स्वातंत्र्यानंतर 70 वर्षात देशात सुमारे 400 विमाने सेवा देत होती ,400 विमाने. सत्तर वर्षात चारशे विमाने. आता विमान सेवा देणाऱ्या कंपन्यांनी या एका वर्षात 1000 नव्या विमानांसाठी ऑर्डर नोंदवली आहे. 70 वर्षात 400 आणि एका वर्षात 1000 नवी विमाने. आपण कल्पना करू शकता.यावरूनच आपण जाणू शकतो की हवाई चप्पल घालणाऱ्या  सामान्य व्यक्तीला, विमान प्रवास घडवण्याचे आमचे स्वप्न किती झपाट्याने पूर्ण होत आहे.

बंधू-भगिनीनो, आपल्याला स्वतःचा विमानतळ मिळाल्याने आपणा सर्वाना देशाच्या दुसऱ्या भागात ये-जा करण्यासाठी सुविधा तर मिळेलच, आपले उत्पन्नही वाढेल . सिक्कीम तर देश आणि विदेशी पर्यटकांसाठीही आवडते ठिकाण नेहमीच राहिले आहे.इथल्या लोकसंख्येपेक्षा जास्त पर्यटक इथे येतात. विमानतळ नसतानाही, राज्याच्या लोकसंख्येच्या दीडपट पर्यटक इथे येतात अशी माहिती मला देण्यात आली आहे.

आता हा विमानतळ झाल्यावर,पर्यटकांची संख्या इतकीच मर्यादित राहणार नाही हे निश्चित. या दिवाळीतच दिसेल. दुर्गापुजे दरम्यान दिसेल की पर्यटकांच्या प्रमाणात कशी वाढ झाली आहे.

हा विमानतळ सिक्कीमच्या युवकांसाठी रोजगारचे एक नवे द्वार ठरणार आहे. यामुळे,हॉटेल, मोटेल, गेस्ट हाउस, घरगुती निवासाची व्यवस्था, पर्यटन, गाईड, रेस्टांरंट यांना चालना मिळणार आहेपर्यटन असा व्यवसाय आहे, गरिबातला गरीब माणूसही कमवू शकतो, चणे-शेंगदाणे विकणाराही कमाई करू शकतो, फुलझाडे विकणाराही पैसे कमवू शकतो, ऑटोरिक्षा चालवणाऱ्याचीही कमाई होते, गेस्ट हाउस वालाही कमवेल आणि चहा विकणाराही कमवू शकेल.          

मित्रहो, वाहतूक आणि पर्यटन क्षेत्राला सरकारने परिवर्तनाचे साधन बनवले आहे. श्रद्धा, अध्यात्माशी जोडलेली ठिकाणे असोत, आदिवासी संस्कृतीशी निगडीत भाग असो, या सर्व क्षेत्रावर विशेष लक्ष दिले जात आहे. भक्त, पर्यटकांसाठी सुविधा निर्माण केल्या जात आहेत. या भागात तर सर्वात उंच कांचनजंगा शिखर आहे आणि नाथुला खिंडही आहे आणि आमच्या सरकारने कैलास मानसरोवर यात्रेसाठी ती खुली केली आहे.

भाविकांसाठी सुविधा निर्माण करण्यासाठी 40 कोटीपेक्षा जास्त निधी स्वीकृत करण्यात आला आहे. इथले पर्यावरण सुरक्षित ठेवण्यासाठी,सिक्कीम हिरवेगार राखण्यासाठी राज्यसरकार समवेत अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत.

केंद्र सरकारने राष्ट्रीय नद्या संरक्षण आराखड्या अंतर्गत  350 कोटीपेक्षा जास्त निधीला मंजुरी दिली आहे. या अंतर्गत जे नऊ आराखडे मंजूर करण्यात आले आहेत त्यात आठ   गंगटोक आणि सिंगटमसाठी आहेत.सुमारे दीडशे कोटी रुपयांचे प्रकल्प रानिचू नदीचे प्रदुषणापासून रक्षण करण्यासाठी आहेत. याशिवाय पर्यावरण रक्षणासाठी देशाच्या संपूर्ण ईशान्य भागासाठी सव्वाशे कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे, त्यापैकी 50 कोटी पेक्षा जास्त निधी वितरीतही करण्यात आला आहे.

मित्रहो, पर्यावरण,परिवहन आणि पर्यटन यांच्या समवेत आपले घनिष्ट नाते आहे.म्हणूनच सिक्किमसाठी केवळ हवाई दळण वळणावर भर  देता दुसरी साधनेही मजबूत करण्यात येत आहेत.सुमारे 1500 कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपयांच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पावरही काम सुरु आहे.याशिवाय सुमारे 250 कोटी रुपये खर्चून छोटे मार्ग बनवण्यात येत आहेत, रस्ते रुंद करण्यात येत आहेत.

रस्त्यांबरोबरच सिक्कीम मधे रेल्वेही मजबूत करण्यात येत आहे. गंगटोकला ब्रॉडगेजने जोडण्याचे काम वेगाने सुरु आहे.

सिक्कीम मधे वीज व्यवस्था सुधारण्यासाठी पारेषण वाहिन्या सुधारण्यासाठी 1500 कोटी पेक्षा जास्त निधीचे सहाय्य राज्याला देण्यात आले आहेया डिसेंबर पर्यंत हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे अशी माहिती मला देण्यात आली आहे.

याशिवाय वीज निर्मितीतही सिक्कीमचा, देशातल्या अग्रस्थानी असलेल्या राज्यात समावेश व्हावा या दिशेने वाटचाल सुरु आहे. सुमारे 14 हजार कोटी रुपये खर्चाच्या सहा जल विद्युत योजनांवर काम सुरु आहे.

बंधू- भगिनीनो,आपणा सर्व सिक्कीमवासियांना, इथल्या सरकारला आणि विशेष करून इथल्या शेतकऱ्यांचे  मी अभिनंदन करतो की सेंद्रिय शेती संदर्भात आपण देशासमोर आदर्श म्हणून सामोरे आला आहात. सिक्कीम, संपूर्णतः सेंद्रिय शेती करणारे देशातले पहिले राज्य ठरले आहे.

सेंद्रिय शेतीला देशभरात प्रोत्साहन देण्यासाठी सरकार अनेक प्रयत्न करत आहे. यासाठी पारंपारिक कृषी विकास योजने अंतर्गत काम करण्यात येत आहे. केवळ सेंद्रिय शेतीवर भर देता त्यासाठी मूल्यवर्धन आणि विपणन व्यवस्थाही करण्यात येत आहे. हा विमानतळ आहे तो आज प्र्वाश्यांसाठी आहे, मात्र तो दिवस दूर नाही जेव्हा इथून फळे-फुले तासाभरात दिल्लीतल्या बाजारपेठेत पोहोचतील.

हिन्दुस्तानमधल्या अनेक देवस्थानांतल्या देवाच्या चरणी, सिक्कीम मधल्या शेतकऱ्याची  फुले अर्पण होणार आहेत. ईशान्येकडच्या राज्यांसाठी सरकारने,’ ईशान्य भागासाठी सेंद्रिय मूल्य विकास अभियान या नावाची एक विशेष योजना सुरु केली आहे, त्यासाठी 400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

मित्रहो, सेंद्रिय उत्पादने आपल्या पर्यावरण आणि धरतीसाठी सुरक्षित आहेतच त्याच बरोबर आपल्याला आजारा पासुनही दूर ठेवतात. देशवासीयांच्या आरोग्याला  सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. काल मुख्यमंत्री मला सांगत होते की गेल्या दहा वर्षात या सेंद्रिय शेतीचा परिणाम दिसत आहे की, इथले आयुर्मान वाढत आहे. याआधीपेक्षा गेल्या दहा वर्षात इथल्या जनतेचे आयुष्यमान वेगाने वाढत आहे आणि त्यातही पुरुषांपेक्षा महिलांचे आयुष्य वाढत आहे.

रासायनिक खत मुक्त जीवन चांगल्या पद्धतीने कसे जगता येते हे देशवासीय, सिक्कीमकडून नक्कीच शिकतील, समजून घेतील असा मला विश्वास आहे.

स्वच्छता ही सेवा अभियानाला सिक्कीमवासियांनी मनापासून अंगिकारले आहे याची मला माहिती आहे.आपले प्रयत्न, आपली जागरूकता यामुळे 2016 मधे सिक्कीमला हागणदारी मुक्त राज्य म्हणून म्हणून सर्व प्रथम जाहीर करण्यात आले होते. एवढेच नव्हे तर प्लास्टिक कचऱ्यापासून मुक्तीसाठीही आपणा सर्वांनी प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

बंधू-भगिनीनो, आयुष्मान भारत  योजनेच्या रूपाने काल जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विषयक योजनेचा प्रारंभ झाल्याचे मी आधी सांगितले आहे. सिक्कीमही या योजनेशी जोडलेले आहे. यामुळे सिक्कीम मधल्या गरीब कुटुंबाना वार्षिक 5 लाख  रुपयांपर्यंतचा आजारासाठीचा, गंभीर आजारासाठीचा खर्च आता सरकारकडून दिला जाईल. इथला नागरिक हिंदुस्तानच्या कोणत्याही भागात  गेला  आणि त्याला रुग्णालयात जाण्याची गरज भासली तरी तिथेही हे पैसे दिले जाणार आहेत. आजारी व्यक्ती कुठेही गेली तरी आयुष्मान भारताचे हे सुरक्षा कवच त्याच्या सोबत राहणार आहे.

मित्रहो, गेल्या चार वर्षात जनसामान्यांचा जीवन स्तर उंचावण्यासाठी, केंद्र सरकार अनेक योजना चालवत आहे, त्याचा सिक्किमलाही  लाभ मिळत आहे. जन-धन योजनेमुळे इथल्या सुमारे एक लाख लोकांची बँक खाती उघडण्यात आली आहेत. सुमारे 80 हजार बंधू-भगिनींना मासिक केवळ एक रुपया आणि 90 पैसे  प्रतिदिन सुरक्षा विमा योजनेशी जोडण्यात आले आहे.

उज्वला योजने अंतर्गत, सुमारे 38 हजार गरीब कुटुंबाना  मोफत गॅस जोडणी देण्यात आली आहे.

मित्रहो, पूर्व भारत, ईशान्य भारतातल्या जनतेचे जीवन सुखकर करण्यासाठी, इथली परिस्थिती सुलभ करण्यासाठी, जीवनमान सुकर करण्यासाठी रालोआ सरकार  कटीबद्धतेसह वाटचाल करत आहे. विकासासाठी या क्षेत्राला, नव्या युगाबरोबर आम्ही जोडू इच्छितो.

या विमानतळामुळे इथे अनेक सुविधा विकसित होतील,ज्या सिक्कीमच्या विकासाला नवा आयाम देतील.आपणा सर्वांचे, आपल्या पहिल्या विमानतळासाठी मी पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन करतो.

मुख्यमंत्र्यांनी अनेक विषयांचा उल्लेख केला आहे,या सर्व विषयांवर त्यांच्याशी माझी व्यक्तिगत चर्चा होत असतेत्यामुळे,त्या विषयांचा सार्वजनिक रूपाने वेगळा उल्लेख करण्याची आवश्यकता नाही.मात्र आपणा सर्वाना मी विश्वास देऊ इच्छितो की देशाला नव्या उंचीवर न्यायचे आहे,सिक्कीमलाही पुढे न्यायचे आहे,सिक्कीम मधल्या प्रत्येक समाज, प्रत्येक व्यक्ती,प्रत्येक युवकाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.

या विश्वासासह मी पुन्हा एकदा आपणा सर्वाना खूप-खूप शुभेच्छा देतो,अभिनंदन करतो.

धन्यवाद !.

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar

 


(रिलीज़ आईडी: 1547287) आगंतुक पटल : 93
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English