नौवहन मंत्रालय
इंदौर-मनमाड नव्या रेल्वे मार्गासाठी सामंजस्य करार
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील मागास भागांच्या विकासासाठी प्रकल्प उपयुक्त ठरणार-नितीन गडकरी
Posted On:
28 AUG 2018 4:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 ऑगस्ट 2018
इंदौर-मनमाड या मार्गावरील 362 किलोमीटर लांबीच्या नव्या रेल्वे प्रकल्पासाठी रेल्वे मंत्रालय, जहाज बांधणी विभागाचा जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सरकार या चौघांमध्ये सामंजस्य करार झाला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियुष गोयल, केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान उपस्थित होते. या प्रकल्पामुळे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातल्या मागास भागांचा विकास होईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
या प्रकल्पामुळे मुंबई-पुण्यापासून मध्य भारतात जाण्याचे अंतर 171 किलोमीटरने कमी होईल. याआधी हे अंतर वडोदरा आणि सुरतमार्गे कापावे लागे. त्यामुळे जेएनपीटीपर्यंत पोहोचायला 815 किलोमीटर प्रवास करावा लागे.

दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्टयातून हा रेल्वे मार्ग जाणार असून इगतपुरी, नाशिक आणि सिन्नर, पुणे आणि खेड तसेच धुळे आणि नरदाना अशा औद्योगिक केंद्रांपासून ही रेल्वे जाणार आहे. या प्रकल्पामुळे येत्या 10 वर्षात 15 हजार कोटी रुपयांचा आर्थिक लाभ होण्याची अपेक्षा आहे. त्याशिवाय मालवाहतुकीचा खर्च आणि इतर खर्चातही मोठी बचत होणार आहे. सध्या असलेल्या मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांना पर्यायी मार्ग म्हणून हा रेल्वे मार्ग उपलब्ध होईल. यातून रोजगार निर्मिती, प्रदूषण नियंत्रण, इंधन बचत आणि वाहनांद्वारे रस्त्यावरुन होणाऱ्या वाहतुकीच्या खर्चातही बचत होणार आहे. हा प्रकल्प सहा वर्षात पूर्ण होणे अपेक्षित आहे.
N.Sapre/R.Aghor/P.Kor
(Release ID: 1544144)