पंतप्रधान कार्यालय

इंडोनेशिया भेटीदरम्यान पंतप्रधांनांचे वक्तव्य

Posted On: 30 MAY 2018 8:27PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 30 मे 2018

 

आदरणीय महोदय,

राष्ट्राध्यक्ष जोको विदोडो,

प्रतिष्ठीत प्रतिनिधी,

प्रसारमाध्यम सदस्य,

सेलामत सियांग

नमस्कार

या महान आणि सुंदर देशाला मी पहिल्यांदाच भेट देत आहे. माझ्या या दौऱ्याचे उत्तम व्यवस्थापन केल्याबद्दल आणि अतिशय स्नेहाने माझे आतिथ्य केल्याबद्दल राष्ट्रपती विदोडो यांचे मी मनापासून आभार मानतो. इंडोनेशियाच्या विविधतेचे दर्शन घडवित, नागरिकांनी आणि लहान बालकांनी ज्या प्रकारे राष्ट्रीय पोशाखात माझे स्वागत केले, त्यामुळे मी भारावून गेलो आहे. राष्ट्रपतींच्या दूरदर्शीपणाबद्दल, पुरोगामी नेतृत्वाबद्दल तसेच आमची भागिदारी अधिक दृढ करण्यासाठीच्या त्यांच्या वैयक्तिक वचनबद्धतेबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे.

 

मित्रहो,

इंडोनेशियामध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निर्दोष लोक मारले गेले, याचे मला अतिव दु:ख वाटते. अशा हल्ल्यांचा भारत निषेध करतो. संकटाच्या या प्रसंगी भारत इंडोनेशियासोबत दृढपणे उभा आहे. दहशतवादाशी लढा देण्यासाठी जागतिक स्तरावर एकत्रितपणे करायचे प्रयत्न अधिक गतिमान करण्याची आवश्यकता असल्याचा संदेश, अशा प्रकारच्या त्रासदायक घटना देत राहतात.

 

मित्रहो,

इंडोनेशियाचे पंचशील तत्वज्ञान, हे इंडोनेशियाच्या नागरिकांच्या विवेकाचे आणि दूरदर्शिपणाचे प्रतिक आहे. यात धार्मिक मान्यतांबरोबर सांस्कृतिक परंपरांचेही विलीनीकरण करण्यात आले आहे. सागरी क्षेत्रातील शेजारी आणि सामरीक भागिदार म्हणून आमच्यासमोर समान समस्या आहेत. सागरी मार्गांचे संरक्षण करणे हे आमचे कर्तव्य आहे. आमच्या आर्थिक हितांचे रक्षण करण्यासाठीही हे आवश्यक आहे. आजच्या बदलत्या इंडो-पॅसीफीक क्षेत्रात जैव धोरणदृष्ट्या आमचे स्थान महात्म्यही विशेष आहे. आपण विकास तसेच पर्यावरणाशी संबंधित असणाऱ्या सारख्याच समस्यांचा मुकाबला करत आहोत. इंडो-पॅसीफीक क्षेत्रातील सहकारी म्हणून परस्परांची प्रगती आणि संपन्नता यातच आपले हीत आहे. आणि म्हणूनच इंडो-पॅसीफीक क्षेत्रासाठीची समान धोरणे आणि सिद्धांतांबाबत आमच्यात सहमती झाली आहे.

 

मित्रहो,

भारताच्या ऍक्ट ईस्ट धोरणाबरोबर सागर अर्थात  Security and Growth for All in the Region साठीचा आमचा दृष्टीकोन आणि राष्ट्रपती विदोडो यांचे सागरी आधार धोरण यांच्यात कमालीचे साधर्म्य आहे. डिसेंबर २०१६ मध्ये राष्ट्रपती विदोडो यांच्या भारत दौऱ्यादरम्यान आम्ही एक आराखडा तयार केला होता. आज त्या आराखड्याच्या कार्यान्वयनाबाबत आम्ही चर्चा केली आणि प्रगतीचा आढावा घेतला. आज आमच्यात झालेल्या करारांमुळे आमचे द्वीपक्षिय संबंध अधिक दृढ होऊ शकतील. आम्ही आमची भागिदारी एकात्मिक धोरणात्मक भागिदारीत अद्ययावत करू शकतो, याचा मला आनंद वाटतो. २०२५ सालापर्यंत आमचा द्विपक्षीय व्यापार ५० अब्ज डॉलरपर्यंत नेण्यासाठी आम्ही दुप्पट प्रयत्न करू. या प्रयत्नांमध्ये सहाय्य करणाऱ्या आमच्या CEO मंचाच्या सकारात्मक योगदानाबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.          

 

मित्रहो,

आमच्या दोन्ही देशांमध्ये अनेक शतकांपासून दृढ सांस्कृतिक संबंध आहेत. आमच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात याची एक झलक पाहायला मिळाली होती. या वर्षीच्या संचलनातही आसियान-भारत संबंधांची झलक, भारतातील ओदिशा राज्यातील "बाली जात्रा या सणाच्या सादरीकरणातून पाहावयास मिळाली. दर वर्षी साजरा होणारा हा सण हजारो वर्षांपासूनचे आमच्यातील सांस्कृतिक संबंध आजही कायम असल्याचे स्पष्ट करणारे उत्तम उदाहरण आहे. पुढच्या वर्षी, २०१९ साली आम्ही आमच्या राजनैतिक संबंधांचा ७० वा वर्धापनदिन साजरा करू.  त्यानिमित्त दोन्ही देशांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. इंडोनिशियामध्ये, विशेषत: बालीमध्ये भारतीय पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत असतात. उत्तराखंड आणि बालीला जुळी शहरे घोषित केल्यास या देवाण घेवाणीत मोठी वाढ होईल. दोन्ही देशांच्या लोकसंख्येत युवकांचा मोठा भरणा आहे.या युवकांची स्वप्ने साकार करण्यासाठी आणि त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या क्षेत्रात आम्ही परस्परांकडून बरेच काही शिकू शकतो.  शिक्षण, विज्ञान तसेच तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य वाढविण्याबाबत आमच्यात सहमति झाली आहे. भारतात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य वाढविण्याबरोबरच त्याच्या विस्तारासाठी इंडोनेशियाच्या नेतृत्वाच्या विचारांचे आम्ही स्वागत करू. दोन्ही देशांसाठी ही भागिदारी लाभदायक ठरेल. 

 

मित्रहो,

 

भारत- आसीयान भागिदारी ही अशी एक शक्ती आहे जी इंडो-पॅसीफीक क्षेत्रात तसेच त्या पलीकडे जाऊन शांतता आणि दोन्ही देशांच्या उन्नतीसाठी हीतकर आहे. आसियान मधील इंडोनेशियाची सकारात्मक भूमिका आमच्यासाठी महत्वाची आहे. त्याचबरोबर व्यापक प्रादेशिक सहकार्य आणि एकीकरणासाठी सुरू असणारे प्रयत्नही प्रेरक आहेत. आसीयानमध्ये भारताची धोरणात्मक भागिदारी विकसित करण्यासंदर्भात इंडोनेशियाने दिलेल्या समर्थनाबद्दल मी राष्ट्रपती विदोडो यांचे आभार मानले आहेत.  ऑगस्टमध्ये १८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी मी इंडोनेशियाला अनेक शुभेच्छा देतो. अतिशय शानदार आणि ऐतिहासीक असे हे आयोजन असेल, अशी मला खात्री वाटते. रमजानच्या या पवित्र महीन्यात भारतातील सव्वा कोटी नागरिकांतर्फे इंडोनिशियामधील सर्व नागरिकांना समृद्धी, उत्तम आरोग्य आणि  यश, लाभो, अशी सदिच्छा मी व्यक्त करतो. आणि सर्वांना आगामी ईद-उल-फित्र सणानिमित्त अनेक शुभेच्छा देतो.

 

अनेकानेक धन्यवाद!

तरीमा कासि बन्याक

 

B.Gokhale/M.Pange/P.Kor



(Release ID: 1534105) Visitor Counter : 79


Read this release in: English